देशातील राजकारणाचे भीष्म पितामह अन् जाणता राजे शरद पवार यांचे सामाजिक वारसदार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामतीमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत निधन झालं. अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत बरीच उलथापालथ असून या अनपेक्षित धक्क्यानंतरही नवीन सत्तासमीकरणे जुळवण्यासाठी कुरघोडी सुरू झाल्या असून कठीण प्रसंगातही निर्णयकी भूमिका ताब्यात ठेवण्याची ‘अजितनिती’ सध्या राज्यामध्ये सुरू झाली आहे. श्रीमती सुनेत्रा पवार यांचा अत्यंत घाईगडबडीत शपथविधी पार पाडण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली असली तरी यामागे शरद पवार यांची भविष्यातील धोका ओळखून टाकलेली खेळी आहे. सुनेत्रा वहिनी यांच्या शपथविधी आधी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत गोप्यस्फोट केल्याने विलीनीकरणांमध्ये अडसर ठरणाऱ्या चार चेहऱ्यांचा (प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ,धनंजय मुंडे) यांचे अधिकार संपुष्टात आणण्यासाठी फायदा झाला आहे. शरद पवारांची सकाळची पत्रकार परिषद केवळ प्रतिक्रिया म्हणून पाहिली, तर प्रत्यक्षात ती एक पूर्ण राजकीय संवादयोजना होती. शब्द कमी, पण अर्थ बहुपेडी. प्रत्येक वाक्य हे कोणासाठी तरी होतं आणि प्रत्येक मौनातही संदेश होता.






“शपथविधी होणार आहे का, हे मला माहीत नाही,” असं सांगताना त्यांची राजकीय रणनीती कदाचित सर्वसामान्य नागरिकांना ‘पटेल’ किंवा नाही; परंतु दोन गट झालेल्या राष्ट्रवादीचे ‘तट’ भक्कम करण्यासाठी पवार परिवारातील अन्य कोणत्याही व्यक्तीने भाषण न करता थेट ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी परिवाराला एकत्र करत सर्व हितचिंतकांची तात्काळ ‘करे’ जुळवली आहेत. अनुभवी शरद पवार यांनी काल दिवसभर स्वतःला या सत्तानाट्यापासून पूर्णपणे बाजूला ठेवलं. हे वाक्य निष्पाप वाटू शकतं, पण त्यातून एक स्पष्ट रेषा ओढली गेली. आज जे काही घडतंय, त्याची जबाबदारी आमची नाही. उद्या सत्ता आली किंवा गेली, गोंधळ झाला किंवा निर्णय चुकला, तरी पवार कुटुंब त्यासाठी जबाबदार धरलं जाऊ नये, हा पहिला आणि महत्त्वाचा संदेश त्यांनी राज्यातील सर्वसामान्य जनतेला दिला. त्यांनी थेट नाव न घेता, पण सूचकपणे पटेल आणि तटकरे यांच्याकडे बोट दाखवलं. हा आरोप नव्हता, तर उघडकीकरण होतं. ‘हे आम्ही नाही, हे काही ठरावीक लोक (प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ,धनंजय मुंडे) करत आहेत,’ असं सांगून अजितदादांचा सध्याचा पक्ष एकसंध नाही, वेगळी यंत्रणा काम करते आहे, भविष्यात या घडामोडींवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं, तर दोष कुणावर जाईल, याची बीजं इथेच पेरली गेली असल्याचा स्पष्ट संदेश दिला आहे.
“एवढ्या घाईत निर्णय का झाला?” हा प्रश्न विचारताना त्यांनी प्रत्यक्षात एका मोठ्या भीतीकडे बोट ठेवलं. राष्ट्रवादीचं पूर्ण विलिनीकरण व्हायला काहींना नको आहे, कारण विलिनीकरण झालं असतं तर सत्तेची केंद्रं बदलली असती. मध्यस्थ, व्यवस्थापक, तडजोडींचे राजकारणी अप्रासंगिक झाले असते. भाजपला सोबत असलेले काही नेते आणि राष्ट्रवादीतील काही प्रभावशाली चेहरे यांनाच हे नको आहे, हा संदेश त्यांनी अप्रत्यक्षपणे दिला. या संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये सर्वात निर्णायक विधान मात्र “बारा तारखेला विलिनीकरण ठरलेलं होतं” हे होतं. या एका वाक्याने अजितदादांच्या पक्षातील सामान्य कार्यकर्त्यांच्या मनात मोठा संभ्रम निर्माण केला. आज जे घडतंय, ते दादांच्या अंतिम इच्छेविरुद्ध चाललं आहे, असा अर्थ त्यातून थेट निघतो. इथे ज्येष्ठ पवारांनी स्वतःला दादांच्या विचारांचा नैसर्गिक वारसदार म्हणून उभं केलं. पटेल-तटकरे हे केवळ व्यवस्थापक आहेत, वारसदार नाहीत, हे ठळक केलं. हा संदेश भावनिकही होता आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत धारदारही आहे.
अस्थी विसर्जनानंतर सुनेत्रावहिनींचा कुटुंबाशी संवाद झालेला नाही, हे सांगणं हा केवळ कौटुंबिक तपशील नव्हता. उर्वरित पवार कुटुंब या निर्णयामागे उभं नाही, हे स्पष्ट करण्याचा तो प्रयत्न होता. यामुळे एक पर्याय उघडा ठेवला गेला. पवार कुटुंब अजूनही वेगळ्या मार्गाने पुढे जाऊ शकतं. या परिषदेआधी काल बारामतीत नीरा नदीची पाहणी करणं हीसुद्धा योगायोगाची कृती नव्हती. बारामती म्हणजे सत्ता, आणि सातबारा म्हणजे मालकी. “बारामतीचा सातबारा मी अजितदादांच्या नावावर केला होता, आता दादा गेल्यावर मूळ मालक म्हणून तो परत घेतला,” हा संदेश शब्दांत नाही, पण कृतीतून देण्यात आला, असं जेष्ठ पत्रकार चौधरी त्यांच्या पोस्टमध्येही म्हणाले आहे. हा भावनिक नव्हे, तर शुद्ध राजकीय संकेत होता. प्रदेश, पकड आणि अधिकार अजूनही आपल्याकडेच आहेत. एकूण पाहिलं तर ही परिषद कोणावरही थेट हल्ला न करता, अनेक आघाड्यांवर परिणाम करणारी होती. स्वतःला सुरक्षित ठेवणं, विरोधकांना उघड करणं, कार्यकर्त्यांच्या मनात प्रश्न निर्माण करणं आणि भविष्यासाठी आपली जागा ठाम करणं. हे सगळं काही शब्दांत साध्य केलं गेलं. यालाच म्हणतात किमान शब्दांत कमाल अर्थ पोचवणं. एका दगडात दोन नव्हे, तर अनेक राजकीय पक्ष मारण्याची कला बारामतीकरांना ज्ञात आहे.
अजितदादा स्वर्गवासी मुंबईत हालचाली अन् सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री; इनसाईड स्टोरी
महाराष्ट्र शोकसागरात
- अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा
- अजित पवार यांच्या पार्थिवावर २९ जानेवारीला शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
- ३० जानेवारीला अजित पवार यांच्या अस्थी नीरा नदीत विसर्जन
- सुनेत्रा पवार यांनाच अजित पवार यांच्या उत्तराधिकारी करण्याचा निर्णय (घटनाक्रम लक्षवेधी)
- ३० जानेवारीची सकाळ- दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची चर्चा
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनकरणाची चर्चा गेल्या तीन ते चार महिन्यांपासून सुरु होती, असा दावा ३० जानेवारीच्या सकाळपासून शरद पवारांच्या पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांनी सुरु केला. शशिकांत शिंदे, अनिल देशमुख, राजेश टोपे यांच्या सारखे महत्त्वाचे नेते विलीनीकरणावर बोलले. दोन्ही पक्ष एक व्हावेत, हीच अजित पवारांची इच्छा होती. त्यांची शेवटची इच्छा पूर्ण व्हायला हवी, असंही बोललं गेलं.
- ३० जानेवारीची दुपार- अचानक ट्विस्ट
याच सुमारास मुंबईत वेगळ्याच घडामोडी सुरु झाल्या. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांची एक बैठक झाली. विधिमंडळाचा गटनेता कोण होणार, उपमुख्यमंत्रिपदी कोण बसणार, यावर चर्चा झाली. त्यात सुनेत्रा पवार यांचं नाव जवळपास निश्चित झालं.
- ३० जानेवारीची संध्याकाळ- मुख्यमंत्र्यांची भेट
मंत्री छगन भुजबळांनी माध्यमांशी संवाद साधला. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली आहे. विधिमंडळाच्या नेत्या म्हणून सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित करण्यासाठी उद्या आमदारांची बैठक होईल. बहुधा उद्याच त्यांचा शपथविधी होईल, अशी माहिती भुजबळ यांनी दिली.
- ३० जानेवारीची रात्र- सुनेत्रा पवार मुंबईला रवाना
संध्याकाळी नीरा नदीत अजित पवारांचं अस्थी विसर्जन झालं. यानंतर पुढील काही तासांमध्ये सुनेत्रा पवार मुंबईला कारनं रवाना झाल्या. त्यांच्या सोबत पुत्र जयदेखील होते.
- ३१ जानेवारीची सकाळ- पवारांचं मोठं विधान
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची कोणतीही कल्पना मला नाही. ही बातमी मला वर्तमानपत्रातून समजली. त्यांच्या पक्षानं हा निर्णय घेतला असेल, असं शरद पवार पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले. सगळे निर्णय मुंबईतून होत आहेत. हा निर्णय कुटुंबात झालेला नाही, ही बाब पवारांनी अप्रत्यक्षपणे सुचवली.
- ३१ जानेवारी- विलीनीकरणावर दादांच्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचं मौन
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबद्दल शरद पवारांचे नेते बोलत असताना अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांनी मौन बाळगलं. आता केवळ विधिमंडळाचा नेता आणि उपमुख्यमंत्री हे दोनच विषय अजेंड्यावर असल्याचं तटकरे आणि भुजबळ यांच्याकडून सांगण्यात आलं.
- ३१ जानेवारीची दुपार- सुनेत्रा पवार विधिमंडळ गटनेतेपदी
दुपारी दोनच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची बैठक झाली. त्यांनी एकमतानं सुनेत्रा पवार यांची निवड विधिमंडळाच्या गटनेतेपदी केली. याबद्दलचा प्रस्ताव मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ठेवला. तर मंत्री छगन भुजबळ यांनी त्याला अनुमोदन दिलं.
- ३१ जानेवारीची संध्याकाळ- सुनेत्रा पवार यांचा शपथविधी
संध्याकाळी पाच वाजता सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावेळी अजित पवार यांच्या समर्थकांनी ‘अजित पवार अमर रहे’च्या घोषणा दिल्या. सुनेत्रा पवार भावुक झाल्या. यावेळी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते, मंत्री आणि आमदार उपस्थित होते. सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत.
- ३१ जानेवारीची संध्याकाळ- खाती जाहीर
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडील खाती जाहीर करण्यात आली. त्यांच्याकडे उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास ही खाती देण्यात आली. अजित पवारांकडील अर्थ खातं त्यांना देण्यात आलेलं नाही. हे खातं मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्याकडेच ठेवलं आहे.
अर्थखातं मुख्यमंत्री फडणवीसांकडेच! सुनेत्रा पवारांकडे ‘या’ खात्यांची जबाबदारी
सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या तासाभरात खातेवाटप जाहीर करण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थखातं स्वतःकडे ठेवलं असून सुनेत्रा पवारांकडे इतर खात्यांची जबाबदारी देण्यात आलीय. सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि अल्पसंख्याक ही खाती देण्यात आलेली आहेत. मंत्रिपदाचा राजीनामा दिलेले माणिकराव कोकाटे यांच्याकडी दोन्ही खाती आता सुनेत्रा पवार बघतील.
सुनेत्रा पवार यांची पोस्ट
“आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. आज त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्य भावनेने उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताना मन अक्षरशः भरून येत आहे. दादांच्या अकाली जाण्याने मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असला, तरी त्यांनी शिकवलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची बांधिलकी हाच माझा खरा आधार आहे. त्यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे काम करत राहीन. या कठीण क्षणी महाराष्ट्रातील जनतेने दिलेली प्रेमाची साथ हेच माझे बळ आहे. आपल्या विश्वासाच्या जोरावर, दादांच्या विचारांना उजाळा देत, नव्या आशेने पुढे चालत राहीन.”
नरेंद्र मोदी यांची पोस्ट
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ सुरू करणाऱ्या सुनेत्रा पवार जी यांना शुभेच्छा. मला विश्वास आहे की त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे स्वप्न पुढे नेतील.











