अमित शाह यांचा 20 वर्ष परदेशात ना सरकारी दौरा..ना खासगी! कारण काय? कामकाज दिल्लीतूनच संवाद किंवा प्रतिनिधी पाठवतात

0

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे एक तत्त्वनिष्ठ राजकारणी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे इतर नेत्यांपेक्षा त्यांची एक वेगळी ओळख आहे. त्यांनी मागच्या २० वर्षांपासून कधीही विदेश दौरा केला नाही.२००६ नंतर त्यांचा परदेशात ना अधिकृत दौरा झाला, ना खासगी दौरा झाला. यामागचं नेमकं कारण काय आणि राजकीय जाणकार काय सांगतात, हे पाहूया.

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या ११ वर्षांमध्ये ९० पेक्षा जास्त विदेश दौरे केले आहेत. जागतिक स्तरावर देशाचं महत्त्व वाढवण्यासाठी हे दौरे नक्कीच कामी आले. मात्र दुसरीकडे अमित शाहांनी असे दौरे टाळून कुठला राजकीय संदेश दिला किंवा काय साधलं, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.

अधिक वाचा  IPL 2026 गाजवणाऱ्या वैभव सूर्यवंशीनं Tata Sierra कारसह ५ पुरस्कार जिंकले मूर्ती लहान, कीर्ती महान! 

अमित शाह कायम एक वेगळा वैचारिक पदर घेऊन राजकारण करत आलेले आहेत. त्यांच्या या भूमिकेलाही एक रणनीती मानलं जातं. शाहांनी कायम इंग्रजी बोलणाऱ्या उच्चभ्रू वर्गापासून अंतर राखलं आणि हिंदी भाषेला संवादाची मुख्य भाषा बनवण्याचा प्रयत्न केला.

विदेश दौरे टाळण्याबाबत अमित शाहांनी कधीही आपली भूमिका सार्वजनिकपणे मांडली नाही. २०१९ मध्ये गृहमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतरही त्यांनी हा निर्णय कायम ठेवला, ही बाब अधिक रंजक आहे. त्यांच्या पूर्वीचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सुरक्षा, सहकार्य आणि धोरणात्मक भागीदारीसाठी अनेक आंतरराष्ट्रीय दौरे केले होते.

गृह मंत्रालयाचे अधिकारी सांगतात की, आंतरराष्ट्रीय समन्वय आणि मंत्रालयस्तरीय मुत्सद्देगिरीचे कामकाज ते दिल्लीमध्ये बसूनच हाताळतात. फारच आवश्यकता असेल विदेशातल्या लोकांशी ते व्हर्च्युअली संवाद साधतात किंवा आपला प्रतिनिधी विदेशात पाठवतात.

अधिक वाचा  राज्यात केवळ 17 लाख शेतकऱ्यांनाच संपूर्ण कर्जमाफी? एवढ्या अटी शर्ती लादल्याने कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण

अमित शाह विदेशात का जात नाहीत?

राजकीय विश्लेषक सांगतात की, साधं राहणीमान, भारतीय संस्कृती, प्रतिकं यांबद्दल असलेला आदर आणि ओढा.. यामुळे अमित शाह भारतीयांच्या मनात सशक्त नेता म्हणून प्रस्थापित होतात. महत्त्वाचं म्हणजे भाजप समर्थक वर्ग त्यांच्याकडे यामुळे आकर्षिला जातो. भविष्यात अमित शाह परदेश दौरा करणार की नाही? हे अनिश्चित आहे. २००६ पासून आजतागायत त्यांनी आपला तत्त्व पाळलेलं आहे.