भारतातील महामार्गांवरून आत्ता दुचाकीने टोल फ्री प्रवास आता करता येणार नाही कारण 15 जुलै 2025 पासून देशभर दुचाकीस्वारांकडूनही टोल वसूल केला जाऊ शकतो, अशी माहिती विविध रिपोर्ट्समध्ये समोर आली आहे. अद्याप यासंदर्भात केंद्र सरकारने अधिकृत अधिसूचना जारी केलेली नसली तरी दुचाकीस्वारांकडूनही टोल वसुलीची तयारी सुरु झाली आहे, असं सांगितलं जात आहे.
आता FASTag दुचाकीसाठीही बंधनकारक?
आत्तापर्यंत FASTag फक्त चारचाकी आणि व्यावसायिक वाहनांसाठीच सक्तीचं होतं. पण, आता सरकार सर्वच वाहनांसाठी FASTag टोल प्रणाली लागू करण्याचा विचार करत आहे.
जर FASTag सक्तीचं झालं, तर दुचाकी मालकांना FASTag खरेदी करावा लागेल. तो आपल्या बँक खात्याशी किंवा डिजिटल वॉलेटशी लिंक करावा लागेल. वाहनावर तो चिटकवावा लागेल. शहराच्या उपनगरात किंवा ग्रामीण भागात राहणारे लाखो लोक दुचाकीने प्रवास करतात. त्यांचा प्रवास आता महाग होणार आहे.
टोल दर किती?
दुचाकीसाठी टोल दर चारचाकींपेक्षा कमी असतील. मात्र, दर राष्ट्रीय किंवा राज्य महामार्ग, टोल ऑपरेटर आणि प्रवासाच्या अंतरावर अवलंबून असतील. तसेच सरकार वार्षिक पास देण्याची शक्यता आहे.
सध्या दुचाकी वाहनांवर टोल लागू नाही, म्हणजेच त्यांना “FASTag फ्री पास” आहे. पण आता ही सुविधा बंद होण्याची शक्यता आहे. सर्व वाहनांसाठी एकसमान टोल प्रणाली लागू करणे हाच यामागचा उद्देश आहे. त्यातून महामार्गांची देखभाल, विस्तार आणि दुरुस्ती यासाठी महसूल वाढवण्याची सरकारची योजना आहे.
टोलचा खर्च वाढल्यास काही दुचाकीस्वार इलेक्ट्रिक पर्यायाकडे वळू शकतात. अनेक राज्यांमध्ये इलेक्ट्रिक दुचाकींना टोलमधून सवलत आहे. त्यामुळे वाहन उत्पादक कंपन्याही FASTag सोबत काही आकर्षक ऑफर देण्याची शक्यता आहे. थोडक्यात काय तर 15 जुलै 2025 पासून दुचाकीस्वारांनाही टोल द्यावा लागणार का? अद्याप निश्चित नाही. पण याची तयारी मात्र सुरु आहे.