महाकुंभामुळे बँक खाती रिकामी झाली आहेत. हे थोडं विचित्र वाटेल पण महाकुंभला जाण्यासाठी करोडो लोकांनी बँकांमधून मोठ्या प्रमाणात पैसे काढले. आता तर बँकांकडे कर्ज वाटपासाठीही पैसे नाहीत, अशी परिस्थिती आहे. बँकांची स्थिती सुधारण्यासाठी आरबीआय आता मोठे पाऊल उचलणार आहे. बँकिंग क्षेत्रातील भांडवली तरलता वाढवण्यासाठी आरबीआयला लवकरच काहीतरी करावे लागेल, असे एका अहवालातून समोर आले आहे.






स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) अहवालानुसार, RBIला बँकांचे भांडवल वाढवण्यासाठी रोख राखीव प्रमाण (CRR) कमी करावे लागेल. अहवालानुसार, भारतीय बँकिंग व्यवस्थेतील हे सर्वात वाईट संकट म्हणून याकडे पाहिले जात आहे.
बँकांची तरलता नोव्हेंबरमधील 1.35 लाख कोटी रुपयांपासून डिसेंबरमध्ये 0.65 लाख कोटी रुपयांच्या तुटीपर्यंत घसरली. जानेवारीमध्ये ही तूट वाढून 2.07 लाख कोटी रुपये होती आणि फेब्रुवारीमध्ये ही तूट 1.59 लाख कोटी रुपये होती.
एसबीआयच्या अहवालात असे म्हटले आहे की, महाकुंभसारख्या मोठ्या धार्मिक कार्यक्रमांमुळे बँकांमध्ये रोख रकमेचा तुटवडा निर्माण झाला आहे. महाकुंभ काळात किरकोळ ठेवीदारांनी बँकांमधून मोठ्या प्रमाणात पैसे काढून महाकुंभात खर्च केले.
या कालावधीत बँकांना रोखीचा तुटवडा सतत जाणवत आहे. याचा परिणाम असा होतो की, काढण्यात आलेल्या चलनाचा मोठा भाग अद्याप बँकिंग व्यवस्थेत परत आलेला नाही. देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयच्या या अहवालावर विश्वास ठेवला तर आता तरलतेशी संबंधित समस्यांवर मात करण्यासाठी आरबीआयला सीआरआर कमी करावा लागेल.
फेब्रुवारीच्या MPC बैठकीतही, RBI ने CRR 0.50 टक्क्यांनी कमी केला होता, ज्यामुळे बँकिंग प्रणालीमध्ये 1.10 लाख कोटी रुपयांचे भांडवल आले. ही रक्कम तरलता वाढवण्यासाठी अपुरी आहे आणि लवकरच सीआरआरमध्ये आणखी कपात करावी लागेल.











