नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर तणाव वाढला आहे. शुक्रवारी (9 मे) रात्रीपासून पाकिस्तानने भारतातील 26 शहरांमधील नागरी भागात ड्रोन हल्ले सातत्याने करत आहे. याशिवाय पाकिस्तानने रात्री उशिरा फतेह-1 हे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागलं. पण भारतीय संरक्षण यंत्रणेने ते वेळीच हवतेच नष्ट केलं. दरम्यान, यानंतर भारताने चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या अनेक एअरबेसवर बॅलिस्टिक मिसाइलने हल्ला चढवल्याचा दावा करत आहे.






तथापि, भारत सरकारने अद्याप या हल्ल्याची पुष्टी केलेली नाही. दरम्यान, पाकिस्तानने भारताविरुद्ध “ऑपरेशन बनायन उल मरसूस” (एक अतूट भिंत) सुरू केलं आहे.
यावेळी पाकिस्तानी लष्कराने दावा केला आहे की, भारताने 6 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. त्यानंतर पाकिस्तानने त्यांचा एअरबेस बंद केला आणि NOTAM जारी केला. तथापि, भारत सरकारने अद्याप या हल्ल्याबाबत कोणतीही पुष्टी केलेली नाही.
पाकिस्तानी सैन्याने काय म्हटले?
पाकिस्तानी लष्कराच्या जनसंपर्क विभागाचे महासंचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, भारताकडून सहा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. भारताने जालंधरमधील आदमपूर एअरबेसवरून ही क्षेपणास्त्रे डागली. जनरल अहमद यांनी भारताच्या या कारवाईला विरोध केला आहे आणि ते बेजबाबदार आणि अत्यंत धोकादायक म्हटले आहे. जर भारताचा हा आक्रमक पवित्रा असाच चालू राहिला तर परिस्थिती अधिक तणावपूर्ण होईल असंही त्यांनी म्हटलंय.
पाकिस्तानी हवाई तळावर स्फोट
भारताने तीन हवाई तळांवर हल्ला केल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. रावळपिंडी, इस्लामाबाद आणि लाहोरमध्ये अनेक मोठे स्फोट झाल्याचे वृत्त आहे. ज्यांचे पडसाद दूरवर जाणवले, त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि ते घराबाहेर पडले.
पाकिस्तानातील रावळपिंडी येथील नूर खान एअरबेसजवळ स्फोट झाला आहे. पंजाब प्रांतातील झंग, शोरकोट येथील रफीकी एअरबेसजवळ स्फोट झाला आहे. चकवालमधील मुरीद बेसजवळही स्फोट झाल्याचे वृत्त आहे.
पाकिस्तानने हवाई क्षेत्र बंद केले
भारतासोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानने आता आपले हवाई क्षेत्र पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत सर्व उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहे. रावळपिंडी आणि रफीकी हवाई तळांवर झालेल्या स्फोटांनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.











