मुंबई : अब्जोंची संपत्ती,राजघराण्याची पार्श्वभूमी, आणि देशाचे केंद्रीय मंत्री वडील. या सर्व गोष्टी असल्यावर, अनेकांना वाटतं की अशा व्यक्तींना कशाचीच कमी नसते आणि संघर्ष करायची गरजही उरत नाही. मात्र या पारंपरिक समजुतीला छेद देत, महाआर्यमन सिंधिया नावाचा एक युवक आजच्या तरुणांसाठी नवा आदर्श ठरत आहे.
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे पुत्र असलेल्या महाआर्यमन यांनी आपल्या आयुष्यात केवळ राजघराण्याचा वारसा वापरून प्रतिष्ठा मिळवण्यापेक्षा, काहीतरी ठोस करून दाखवण्याची वाट निवडली. त्यांनी 2021 मध्ये ‘MyMandi’ नावाचा स्टार्टअप सुरू केला, जो ताज्या फळभाज्या आणि भाजीपाल्याचा थेट पुरवठा ग्राहकांपर्यंत पोहोचवतो.
‘My Mandi’ थेट शेतकऱ्यांकडून ग्राहकांपर्यंत
या स्टार्टअपने मधली दलालीची साखळी तोडून शेतकऱ्यांकडून थेट उत्पादन घेऊन ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा आदर्श मार्ग निर्माण केला आहे. महाआर्यमन यांनी स्वतः सकाळी लवकर उठून मार्केटमध्ये जाऊन भाज्या खरेदी केल्या, पुरवठा साखळी समजून घेतली आणि अनेक वेळा शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.
त्यांच्या या प्रयत्नांमुळे My Mandi केवळ एक व्यवसाय न राहता, शाश्वत विकास आणि ग्रामीण सक्षमीकरणाचं उदाहरण बनलं आहे. उद्योगजगतातील दिग्गजांनीही हे ओळखलं इतकंच नाही तर दिवंगत रतन टाटा यांनी देखील ‘MyMandi’ मध्ये गुंतवणूक करून या उपक्रमाला मान्यता दिली.
विदेशी शिक्षण, पण देशासाठी योगदान
महाआर्यमन यांचे शिक्षण दून स्कूल आणि अमेरिकेतील युनिव्हर्सिटीत झाले असून, त्यांनी ‘Boston Consulting Group’ आणि ‘SoftBank’ सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम केले आहे. पण त्यांच्या मनात भारतातील ग्रामीण भागासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती, आणि म्हणूनच त्यांनी कॉर्पोरेट जगतापासून दूर जाऊन शेती आणि शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायचं ठरवलं.
सध्या पाच शहरांमध्ये विस्तारलेली सेवा
आज ‘MyMandi’ भारतातील 5 प्रमुख शहरांमध्ये कार्यरत आहे. हजारो शेतकरी, ग्राहक आणि विक्रेते यांना जोडणारे हे एक मजबूत नेटवर्क बनले आहे. आतापर्यंत स्टार्टअपने 1.2 मिलियन डॉलरहून अधिक निधी उभारला असून कंपनीचे मूल्यांकन 150 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.