विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांत उष्णतेचा प्रभाव अधिक जाणवत असून मुंबईसह राज्यातील 5 जिल्ह्यांना तापमानाचे तीव्र इशारे देण्यात आले आहेत. राज्यातील बहुतांश भागांत फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. पुढील काही दिवसांत तापमानात मोठी वाढ होणार असून राज्यभरातील नागरिकांना उष्णतेच्या झळा जाणवणार असल्याचे हवामान विभगाने सांगितले.
राज्यात आता पावसाची शक्यता ओसरली असून पुढील 5 दिवस कोरडे हवामान राहणार आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात येत्या चार दिवसात तापमान 36-38 अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. कोकणातही किमान व कमाल तापमानात कमालीची वाढ झाली असून येत्या 3 दिवसांत 2-3 अंशांनी कमाल तापमानात वाढ होणार असल्याचं सांगण्यात आलंय. विदर्भात येत्या तीन दिवसांत तापमान चढेच राहणार असून त्यानंतर तापमान 2-4 अंश सेल्सियसने वाढणार आहे.
सर्वाधिक तापमानाच्या नोंदी
कोकण गोवा सामान्य तापमानाच्या तुलनेत 3-5 अंश सेल्सियसहून अधिक तापमानाची नोंद करण्यात आली. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही भागात तापमानाचा पारा 1-3 अंशांनी अधिक होता. पूर्वेकडील वाऱ्यांच्या प्रभावाने देशात इशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या 24 तासांमध्ये विदर्भ, मध्य महाराष्ट्रात काही भागांमध्ये 1-3 अंशांने तापमानात वाढ झाली. कोकण गोव्यात 3-5 अंशांनी तापमान चढे होते. मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा 35-39 अंशांवर राहिला. विदर्भासह कोकणात सर्वाधिक तापमानाच्या नोंदी झाल्या. 23 फेब्रुवारीला रत्नागिरीत सर्वाधिक 38.4 अंश तापमानाची नोंद झाली. कोकणात सामान्य तापमानाहून साधारण 5 अंश सेल्सियसने अधिक तापमानाची नोंद झाली.
हवामान विभागाचा अंदाज काय?
सध्या नव्याने चक्राकार वाऱ्यांसह पश्चिमी चक्रावात तयार होत असून हिमालयीन प्रदेशातून आर्द्रता कमी होत जाणार असून अरबी समुद्रात 25-28 तारखेपर्यंत सक्रीय राहणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. याचा परिणाम महाराष्ट्रावरही अल्प प्रमाणात झाला. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची हजेरी राहणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार, काही भागात ढगाळ वातावरण होते. काही भागात तापमात उर्वरित राज्याच्या तापमानाच्या तुलनेत कमी वाढ झाली. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आता कोकण-गोव्यात 25 फेब्रुवारीपर्यंत प्रचंड उष्ण आणि आर्द्रता राहणार असून घामाच्या धारा आणि उकाड्याने नागरिक हैराण होणार आहेत. दक्षिण कोकण पट्ट्यात येत्या 3 दिवसांत प्रचंड उष्णता जाणवणार असल्याचं सांगण्यात आलंय.
राज्यात पुढील दोन दिवस तापमानाचे यलो अलर्ट
प्रादेशिक हवामान विभागाने राज्यात मुंबई, पालघरसह कोकण पट्ट्यात तीव्र हवामानाचे इशारे दिले आहेत. पाच जिल्ह्यांना उष्ण आणि आर्द्र हवामानाचे यलो अलर्ट देण्यात आले असून पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये तीव्र तापमान बदलामुळे नागरिकांना उष्णतेच्या चटक्यासह आर्द्र हवामानामुळे उकाड्याला सामोरं जावं लागणार आहे. राज्यातील बहुतांश भागांत फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांत उष्णतेचा प्रभाव अधिक आहे. पुढील काही दिवसांत उष्णतेची लाट वाढण्याची शक्यता आहे. यासंदर्भात पुणे विभागाचे हवामान विभागाचे प्रमुख के. एस होसाळीकर यांनी X माध्यमावर पोस्ट करत अंदाज वर्तवला आहे.
राज्यात रविवारी सर्वाधिक तापमानाच्या नोंदी
शहादा, नंदुरबार – 42.3°
करजत, रायगड – 39.9°C
INS शिवाजी, लोनावळा (पुणे) – 39.8°C
मुंबई सांताक्रूझ – 37.7°C
औरंगाबाद – 37.2°C
चंद्रपूर – 37.2°C
अकोला – 39.5°C
सोलापूर – 39.4°C
तळेगाव (पुणे) – 38.7°C
रत्नागिरी AWS – 38.2°C