‘भाजपकडे एक इन्स्ट्रूमेंट आहे, यामुळेच २७ वर्षांनी मोठा विजय’; दिल्ली महाविजयानंतर भाजप मंत्र्याचे सूचक विधान

0

पुणे : २७ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर भाजपचे दिल्लीतील ‘सत्ता’स्वप्न पूर्णत्वास आले आहे. भाजपने दिल्ली विधानसभा निवडणुकीत महाविजय मिळवला आहे. ४८ जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. तर आपला केवळ २२ जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर काँग्रेसचा यंदाही सुपडासाफ झाला आहे. यावर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यातच मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही भाजपच्या दिल्लीतील महाविजयावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘भाजपकडे एक इन्स्ट्रूमेंट आहे, त्यामुळे मोठा विजय मिळतो’ असे मोठे विधान बावनकुळे यांनी केले आहे.

बावनकुळे म्हणाले, भाजपला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. ७० पैकी ४८ सीट मिळाल्या आहेत. दिल्लीकरांनी भाजपवर विश्वास या निकालामध्ये प्रतिबिंबित होत आहे. केजरीवाल आणि काँग्रेसच्या गैरकारभारामुळे २७ वर्षानंतर भाजपला हा विजय मिळाला आहे. २७ वर्षांत जो विकास झाला नाही त्यासाठी मोदींच्या नेतृत्वात भाजप सरकार न्याय देणार आहे. तर मत विभाजनाचा मुद्द्यावर प्रश्न विचारला असता बावनकुळेंनी हा दावा खोडून काढला आहे. ‘मतविभाजन झाले यात काही तथ्य नाही. महाराष्ट्रात आघाडीवाले एकत्र होते तरी काही फायदा झाला नाही. आमचे संघटन काम करत आहेत, योग्य उमेदवार आणि निवडणुकीचं कौशल्य आहे, हे भाजपकडे इन्स्ट्रूमेंट आहे, त्यामुळे भाजपला मोठा विजय मिळतो’ असेही बावनकुळेंनी नमूद केले.

अधिक वाचा  काँग्रेसचा अजातशत्रू नेता सलग 8 टर्म आमदार, राज्यसभेवर? नेमस्त, मुत्सद्दी, अजातशत्रू नेते अशी ओळख हालचालींना वेग, शरद पवारांचं काय?

तर काँग्रेसवर टीकास्त्र डागत बावनकुळे म्हणाले, काँग्रेसने आता आत्मचिंतन केले पाहिजे. उद्यापासून मशीन खराब झाली म्हणू नये. राहुल गांधींना महाराष्ट्राचा निकाल पचवत नाहीये. काँग्रेस पार्टी नीतिमत्तेमुळे हरलेली आहे. राहुल गांधी हे विकसित भारताच्या पद्धतीला निगेटिव्ह पद्धतीने घेत आहेत, त्यामुळे जनता राहुल गांधींना दूर करत आहे. काँग्रेसचे ना मॉडेल आहे, ना नीतिमत्ता आहे. २०४७ पर्यंत काँग्रेस पार्टी दिसणार नाही. मोदींनी विकसित भारत दाखवला आहे.

आप-काँग्रेसच्या राजकारणावर बोट ठेवत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, काँग्रेस आणि आपची जर युती झाली असती तर भाजपला ७० पैकी ७० जागा मिळाल्या असत्या. काँग्रेससोबत आप गेली असती तर एकही जागा जिंकता आली नसती. कारण काँग्रेस पार्टी एक असं ग्रहण आहे की, ज्यामुळे आप पार्टी संपूर्ण डुबली असती. काँग्रेसला सोबत न घेतल्याने आप थोडीफार वाचली आहे, अशी घणाघाती टीकाही बावनकुळेंनी केली आहे.

अधिक वाचा  अखेर महाराष्ट्राला मिळणार विरोधीपक्ष नेता! विधान परिषदेची दबंग नेत्याकडे जबाबदारी