मराठी विश्व संमेलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून मराठी भाषेच्या संवर्धनावर भर दिला. तीन दिवसीय साहित्य संमेलनाच्या सांगता सोहळ्यात त्यांनी स्पष्ट शब्दांत मराठी भाषा, तिच्या अस्तित्वासाठी आणि मराठी माणसाच्या हक्कांसाठी आवाज उठवला. मराठी भाषेच्या सन्मानासाठी आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी राज ठाकरे यांनी जोरदार भाषण केले. त्यांनी साहित्यिकांना समाजाला दिशा देण्याचे आवाहन केले, सरकारला मराठी माणसांचे हक्क जपण्यास सांगितले आणि तरुण पिढीला मराठी वाचनसंस्कृती जोपासण्याचा सल्ला दिला.






“मी कसा इथे?” – राज ठाकरेंनी स्पष्ट केली उपस्थिती
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मिश्किल अंदाजात म्हटले, “तुमच्या मनात प्रश्न असू शकतो की, मी इथे कसा आलो? पण उदयजींनी मला आग्रह केला आणि मी आलो.” या विधानाने उपस्थितांमध्ये हास्याची लहर उमटली.
राज ठाकरे यांनी भाषेच्या महत्त्वावर भर देत सांगितले की, “आपली मुलं एकमेकांशी हिंदीत बोलत आहेत, ही चिंतेची बाब आहे. आपण जर आपल्या भाषेबाबत ठाम राहिलो, तरच जग आपल्याला किंमत देईल.”
त्यांनी ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताचा उल्लेख करत विचारले की, “कुठल्या राज्याचे असे स्वतंत्र गीत आहे?” यावरून त्यांनी महाराष्ट्राच्या वैभवाचा आणि इतिहासाचा पुनरुच्चार केला.
मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ठाम भूमिका
“मराठी माणसाचं अस्तित्व जपायला हवं. राज्य सरकारने शहरांमध्ये मराठी माणसांना स्थान मिळवून द्यायला हवं,” असे म्हणत त्यांनी मराठी बांधवांच्या भविष्यासाठी चिंता व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, “हिमाचल प्रदेशमध्ये भारतीय असूनही जमीन खरेदी करता येत नाही, मग महाराष्ट्रात बाहेरचे लोक सहज जमिन का विकत घेतात?” या विधानातून त्यांनी सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
पुरस्कार आणि तिरस्काराचा मुद्दा
“अभिनेत्यांना पुरस्कार मिळतात, पण आम्हाला फक्त तिरस्कार मिळतो,” असे म्हणत त्यांनी कलाकार आणि राजकारण्यांच्या मिळणाऱ्या वेगवेगळ्या प्रतिसादांवर भाष्य केले. त्यांनी उपस्थित साहित्यिकांना विनंती केली की, “साहित्यिकांनी समाजासाठी योग्य दिशा दाखवली पाहिजे. राजकीय मतं मांडणं गरजेचं आहे.”
मराठी भाषेसाठी ठोस भूमिका –
राज ठाकरे यांनी उदय सामंत यांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, “मराठी भाषेसाठी काही करत असू, तर त्याला पाठिंबा द्या, केसेस टाकू नका.” राज ठाकरे यांनी तरुणाईला वाचनसंस्कृती वाढवण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “संमेलनातून बाहेर पडताना प्रत्येकाने किमान १० पुस्तके विकत घ्यावीत.”
छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यावर नवीन चित्रपट
त्यांनी अभिनेते रितेश देशमुख यांच्या चित्रपटाचा उल्लेख करत सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित एक चित्रपट येत आहे. यानंतर संभाजी महाराजांवरही नवीन चित्रपट येणार आहे.”
जातीयवादाचा निषेध –
राज ठाकरे यांनी जातीपातीच्या राजकारणावर टीका करत म्हटले की, “आपल्या महापुरुषांना जातीपातीमध्ये अडकवू नका. प्रत्येक महापुरुष हा संपूर्ण महाराष्ट्राचा आहे.”













