भाजपचे अजितदादांसोबत सरकार शक्य, तरी शिंदेंची मनधरणी का? ‘ही’ आहेत खुप मोठी कारणे अन् गणितं..

0

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून 10 दिवस उलटले असले तरी सत्तास्थापनेसाठी अद्याप हालचाली पूर्ण झालेल्या नाहीत. महायुतीला बहुमत मिळूनही मुख्यमंत्री पदासाठी अंतिम निर्णय घेण्यात विलंब होत आहे.भाजपच्या वतीने मुख्यमंत्रीपदाचा दावा निश्चित मानला जात असला तरी व्यक्ती कोण हे अद्याप स्पष्ट नाही. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील असे बोलले जात असले तरी अधिकृत घोषणा झालेली नाही.

दरम्यान, सरकार स्थापनेचा दावा भाजपने केलेला नाही आणि राज्यपालांनीही निमंत्रण दिलेले नाही. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे सरकार स्थापनेला विलंब होत असल्याची चर्चा आहे. मात्र, भाजपने त्यांना बाजूला ठेवून सरकार स्थापन न करण्यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत.

अधिक वाचा  रुद्रम-II मिसाइलची यशस्वी चाचणी सुखोई-30 मधून शूट होताच थेट टार्गेट उद्धवस्त, सुरक्षा कवच भेदणं या सिस्टिममुळे शक्य

मुख्यमंत्र्यांच्या नावावर एकमताचा अभाव?

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित मानले जात असले तरी पक्षातील काही गटांना त्यांची जात (ब्राह्मण) लक्षात घेऊन नाराजी आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजाचा राजकीय प्रभाव मोठा असल्याने भाजपला एकनाथ शिंदे यांच्यासारख्या मराठा नेत्याला बाजूला ठेवणे कठीण आहे.

मराठा आरक्षणाचे राजकारण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा विषय आहे. मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षण संघर्षामध्ये एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केली आणि महायुतीला मराठा समाजाचा मोठा पाठिंबा मिळवून दिला. त्यामुळे शिंदेंना बाजूला ठेवणे भाजपसाठी धोरणात्मक दृष्ट्या अडचणीचे ठरू शकते.

अधिक वाचा  राज्यात केवळ 17 लाख शेतकऱ्यांनाच संपूर्ण कर्जमाफी? एवढ्या अटी शर्ती लादल्याने कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण

मुंबई महापालिका निवडणूक

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंचे नेतृत्व महत्त्वाचे मानले जात आहे. 30 वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात असलेली ही महापालिका भाजपसाठी महत्त्वाची आहे. विधानसभा निवडणुकीत शिंदेंच्या नेतृत्वाखाली महायुतीला मोठे यश मिळाले होते. त्यामुळे आगामी निवडणुकीतही त्यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते.

अजित पवारांचे ब्लॅकमेलिंग टाळण्यासाठी

एकनाथ शिंदेंना बाजूला ठेवून भाजपने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केले, तर भविष्यात पवार यांचे ब्लॅकमेलिंग होऊ शकते, अशी भीती भाजपला आहे. शिंदे यांच्यासोबत बार्गेनिंग करणे भाजपला सोयीचे वाटते, पण अजित पवारांचा किंगमेकर म्हणून उदय झाल्यास भाजपचे धोरणात्मक निर्णय कठीण होऊ शकतात.

अधिक वाचा  बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने संत कबीरांची ६२८ वी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न

अजित पवारांचा पूर्वेतिहास

अजित पवार यांच्याबाबत भाजप नेहमी सावध राहिले आहे. त्यांच्या राजकीय वर्तणुकीवर भाजपला नेहमीच संशय राहिला आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसल्यानंतर भाजपमध्ये अजित पवारांविषयी नाराजी दिसली होती. तरीही विधानसभा निवडणुकीतील चांगल्या कामगिरीनंतर त्यांचा उघड पाठिंबा मिळाला आहे.

भाजपने एकनाथ शिंदेंना बाजूला ठेवून सरकार स्थापन केल्यास राजकीय आणि धोरणात्मक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी अजून वेळ लागेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.