महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रीपदासाठी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठिंब्याचे पत्र दिले असल्याचे समोर आले आहे.या घडामोडीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय भवितव्याबाबत दोन पर्याय समोर येत आहेत.
मुख्यमंत्रीपदाचा पेच आणि केंद्रीय नेतृत्वाची भूमिका
महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदाचा पेच सोडवण्यासाठी आता केंद्रीय नेतृत्वालाच हस्तक्षेप करावा लागणार आहे. अजित पवार गटाने सूचित केले आहे की, येत्या एक-दोन दिवसांत महाराष्ट्रातील नेते दिल्लीत जाणार आहेत किंवा केंद्रातील नेते थेट महाराष्ट्रात येऊन हा पेच सोडवणार आहेत. यामुळे राज्यातील राजकीय परिस्थिती स्थिर होण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण घडामोडी घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
शिंदेंना केंद्रात मंत्रीपदाची ऑफर?
सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्र सरकारकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना केंद्रीय मंत्रीपदाची किंवा राज्यात उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली गेली आहे. मात्र, या प्रस्तावांवर अद्याप राज्य पातळीवर निर्णय झालेला नाही. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाला मध्यस्थी करावी लागणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
भाजपाची सत्ता स्थिर ठेवण्याचा प्रयत्न
महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्यातील सत्ता स्थिर ठेवण्यासाठी केंद्राकडून प्रयत्न सुरू आहेत. भाजपकडे सध्या बहुमताच्या जवळ जाणारे आकडे आहेत, मात्र, सत्तेचा समतोल राखण्यासाठी मित्रपक्षांसोबत सामंजस्य राखणे आवश्यक झाले आहे. शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटासोबत भाजपाने सत्तेचा समन्वय टिकवण्याचा मोठा प्रयत्न केला आहे.
मंत्रीमंडळाचा फॉर्म्युला आणि २०१९ ची खबरदारी
भाजपाचे केंद्रीय नेतृत्व राज्यातील मंत्रीमंडळाचा फॉर्म्युला आणि इतर पदांवरील समन्वय साधण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये कोणताही गट असंतुष्ट राहणार नाही याची काळजी घेतली जात आहे. २०१९ मध्ये मोठा पक्ष असूनही सत्तेसाठी संघर्ष करावा लागल्याने भाजपाने आता असा पेच निर्माण होऊ नये याची खबरदारी घेतली आहे.
शिंदेंच्या भूमिकेबाबत उत्सुकता
या घडामोडींमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिंदे यांनी केंद्राच्या प्रस्तावाला होकार दिल्यास, त्यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. मात्र, राज्य पातळीवर सत्तेची स्थिती कायम ठेवण्यासाठी शिंदे गटाचे बळ किती महत्त्वाचे आहे, हे भाजपाला जाणवले आहे.
पुढील काही दिवस महत्त्वाचे
महाराष्ट्रातील राजकारणात पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. अजित पवार गटाच्या पाठिंब्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार का, किंवा एकनाथ शिंदे यांना केंद्रीय मंत्रीपद दिले जाणार का, याचा निर्णय लवकरच होईल. या बदलांमुळे राज्यातील सत्तास्थितीवर मोठा परिणाम होणार आहे.