विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला (Mahayuti) राज्यात घवघवीत यश मिळालं असून 288 मतदारसंघांतील निवडणुकांपैकी तब्बल 237 जागांवर भाजप महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. त्यामुळे, महायुतीचं सरकार स्थापन होणार हे आता निश्चित झालं आहे. मात्र, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावरुन चांगलच रणकंदन माजलं आहे. त्यातच, मुख्यमंत्रीपद भाजपकडेच राहणार असल्याचा निर्णय दिल्लीत झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) नाराज झाल्याची माहिती आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देवगिरी बंगल्यातून सुरक्षेशिवाय बाहेर पडल्याचे समजते. एकीकडे राज्यात मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं राजकारण व घडामोडी घडत असताना अजित पवार हे अचानक दिल्लीला गेल्याची चर्चाही मुंबईतील त्यांच्या बंगल्याबाहेर सुरू आहे.
शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सीएम पदासाठी इच्छुक असून त्यांचे आमदारही सातत्याने एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील, असा दावा करत आहेत. मात्र, राजधानी दिल्लीत आज महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. भाजपकडेच राज्याचे मुख्यमंत्रीपद राहील हे निश्चित झाल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याचे समजते. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांना दिल्लीतून हा निरोप कळवण्यात आला आहे. त्यानतंर, एकनाथ शिंदे नाराज झाले असून सायंकाळनंतर सर्व भेटीगाठी त्यांनी रद्द केल्याची माहिती आहे. तर, एकनाथ शिंदे काही मोठा निर्णय घेणार का? की महायुतीसोबतच राहणार की वेगळा विचार करतील? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, गृहमंत्री अमित शहा मुंबईत येऊन करणार मुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणा करतील, असेही समजते.