जरांगे यांनी विरोध केलेले उमेदवार सहज विजयी; ओबीसी समाजाने ताकद दाखवली ओबीसीचे प्रश्न सुटण्याची अपेक्षा

0
1

”विधानसभा निवडणुकीचा निकाल ही मनोज जरांगे-पाटील यांना चपराक आहे. यंदाचा निवडणुकांना जातीय स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु ओबीसी समाजाने आपली ताकद दाखवून दिली आहे.आता तरी जरांगे पाटील यांनी बोध घेऊन सामोपचाराची भूमिका घ्यावी,” असे आवाहन ओबीसी आंदोलनाचे लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी केला. राज्यात आता महायुतीचे सरकार आल्यामुळे ओबीसी समाजाचे प्रश्न वेगाने सुटतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर हाके म्हणाले, ”राज्यात अठरापगड जाती आहेत. त्यात ओबीसी समाजाचादेखील समावेश आहे. या समाजात निकाल फिरविण्याची क्षमता आहे आणि ती दिसून आली आहे. हे वास्तव जरांगे पाटील यांनी लक्षात घ्यायला हवे. जरांगे यांनी आरक्षणाबाबत सतत बदलती भूमिका घेतली. त्यामुळे मराठा समाजात मतभेद निर्माण होऊन गोंधळ निर्माण झाला.”

अधिक वाचा  राज्यात 8 जिल्ह्यांना पुन्हा ‘ऑरेंज’अलर्ट गणेश विसर्जन पावसात?; कोकण, मध्य महाराष्ट्र अतिवृष्टीचा इशारा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत पावले उचलली. ती सर्वांनाच मान्य होती, परंतु जरांगे यांना ओबीसी समाजातूनच आरक्षण पाहिजे होते. हा त्यांचा हेकेखोरपणा आहे. मराठा समाजात जागरूकता निर्माण करण्याऐवजी जरांगे राजकारण खेळू लागले. ठराविक पक्षाला निवडून आणा, ठराविक पक्षाचे उमेदवार पाडा, ही त्यांची भूमिका नागरिकांना पटली नाही. त्यामुळे त्यांनी विरोध केलेले उमेदवारही विविध ठिकाणी सहज निवडून आले, असे हाके यांनी नमूद केले.

‘महसूल किंवा शिक्षण मंत्रिपद हवे’

राज्यात महायुतीचे सरकार स्थापन व्हावे, यामध्ये ओबीसी समाजाचा मोलाचा वाटा आहे. या समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी मी राज्यभर दौरे केले. त्याचा उपयोग महायुतीला झाला. त्यामुळे माझ्या क्षमता लक्षात घेऊन मला कॅबिनेट मंत्रिपद दिले पाहिजे. केवळ विधान परिषदेवर जाण्यात मला स्वारस्य नाही. महसूल किंवा शिक्षण मंत्रिपदाचा कार्यभार माझ्याकडे द्यावा, अशी मागणी महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांकडे केली असल्याची माहिती लक्ष्मण हाके यांनी दिली.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे