‘ईडीपासून सुटेकसाठी भाजपसोबत’, पुस्तकातून खळबळजनक दाव्यानंतर भुजबळ म्हणाले, ‘नको ते माझ्या तोंडी…’

0

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच दररोज नवं नवीन घडामोडी आणि आरोप प्रत्यारोप राज्यात होत असतात. या रणधुमाळी राष्ट्रवादी अजित पावर गटाचे नेते छगन भुजबळ यांनी एका पुस्तकात खळबळजनक दावा केलाय. ईडीच्या भीतीने आम्ही सर्वांनी बंडखोरी करून भाजपसोबत महायुतीत सहभागी झालो. माझ्यासाठी तर ईडीपासून सुटका म्हणजे एक प्रकारे पुनर्जन्मच होता, असं त्या पुस्तकात म्हटलंय. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या ‘2024: द इलेक्शन देंट सरप्राइज्ड इंडिया’ या पुस्तकात हे दावे करण्यात आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.

‘नको ते माझ्या तोंडी…’

दरम्यान पुस्तकात कऱण्यात आलेले आरोप छगन भुजबळांनी फेटाळलेत. पुस्तकात करण्यात आलेले दावे खोटे आहेत. ईडीच्या भीतीमुळे भाजपसोबत गेलो हे आरोप आधीपासून करण्यात येतोय. तर महाराष्ट सदन घोटाळ्यात क्लीन चीट मिळाल्याचंही भुजबळ म्हणालेत. नको ते माझ्या तोंडी घातल्याचं भुजबळ म्हणालेत . त्यामुळे पुढील 7 ते 8 दिवसात पुस्तक वाचून वकिलांमार्फात कायदेशीर कारवाई करू असा इशाराही भुजबळांनी दिलाय.

अधिक वाचा  भाजपचा महाराष्ट्रभर झंझावात; पण येथे अख्ख्या पॅनलचं डिपॉझिट जप्त; पक्षाचा आलेला निधी देखील तळापर्यंत गेलाच नाही; प्रदेश पातळीवर मोठी खलबते होणार 

नेमकं भुजबळ पुस्तकात काय म्हणालेत?

या पुस्तकातून छगन भुजबळ यांनी दिलेल्या मुलाखतीनुसार ते म्हणाले की, मी ओबीसी असल्याने केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे लागल्या. उच्च जातीचा असतो तर मला असे वागवले नसते. दोन-अडीच वर्षे तुरुंगात काढल्यावर जामिनावर असताना मला ईडीची पुन्हा नोटीस आली. वयाच्या पंचाहत्तरीत किती वेळा चौकशांना सामोरे जायचे, असा प्रश्न होता. आधी 100 कोटींच्या आरोपांवरून राष्ट्रवादीचे आणखी एक नेते अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली होती. तुरुंगात असताना भाजपमध्ये सहभागी व्हा तरच सुटका होईल, असा निरोप देशमुख यांना देण्यात आला होता. मलाही अडकविण्याचा पुन्हा प्रयत्न करीत असावेत. अजूनही तुरुंगातील दिवस आठवले की माझी झोप उडते. आता या वयातही ईडी माझा पिच्छा सोडायला तयार नाही.

मला, देशमुख आणि मलिकांना ईडीने अटक केली होती. अशा वेळी पंतप्रधान मोदी वा भाजपबरोबर हातमिळवणी केल्याशिवाय सुटका नाही ही साऱ्यांचीच भावना झाली होती. हा विषय आम्ही पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे मांडला. पवारांना हे सारे समजत होते. पण ते भाजपबरोबर जाण्यास अनुकूल नव्हते. तेव्हा अखेर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या आमदारांनी भाजपबरोबर हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय पक्षाच्या बहुतांश नेत्यांना मान्य होता. भाजपबरोबर गेल्याने ईडीच्या जाचापासून साऱ्यांचीच सुटका झाली, असे भुजबळ म्हणाले असल्याचा पुस्तकात उल्लेख करण्यात आला आहे.

अधिक वाचा  काँग्रेसमधील बड्या नेत्याचा अजितदादांना फोन; या महापालिकेत एकत्र लढायचं का? कार्यकर्त्यांनी 238 मतदारसंघात… दादांचं हे मत

अजित पवार यांचीही ईडीने चौकशी सुरू केली होती. साखर कारखान्याच्या विक्रीवरून अजित पवार यांना घेरण्यात आले होते. या कारखान्यात सर्वाधिक भागभांडवल हे अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावे होते. कदाचित पत्नीला अटक होऊ शकते, असे अजित पवारांच्या निदर्शनास आणून देण्यात आले तेव्हा अजितदादांनाही घाम फुटला होता, अशी माहिती राष्ट्रवादीच्याच एका नेत्याने दिली. यानंतर अजित पवार यांनी लगेचच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासह शरद पवारांची भेट घेतली होती. यावर तोडगा कसा काढायचा यावर विचारविनिमय झाला. प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात ईडीची कारवाई झाली. त्यांच्या इमारतीमधील चार मजले ईडीने जप्त केले. सुनील तटकरे यांचीही ईडी चौकशी सुरू झाली होती. या तिन्ही नेत्यांनी भाजपबरोवर हातमिळवणी करू, अशी शरद पवारांकडे बाजू मांडली होती. शरद पवारांनी भाजपबरोबर जाण्यास नकार दिल्यावर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी भाजपच्या नेत्यांबरोबर पुन्हा वाटाघाटी सुरू केल्या. भाजपबरोबर हातमिळवणी करण्याच्या बदल्यात ईडीची चौकशी सुरू असलेल्या नेत्यांची प्रकरणे बंद केली जातील वा त्यासाठी यंत्रणेकडून पाठपुरावा केला जाणार नाही, असा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे.’ दरम्यान भुजबळ यांनी मात्र हे पुस्तकातील दावे फेटाळून लावले आहेत. मी अशी कुठलही मुलाखत दिली नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय.

अधिक वाचा  भाजपची यादी पुण्यात दाखल अजूनही प्रवेश सुरूच?; प्रशांत जगतापांचा ‘करेक्ट’ कार्यक्रम? काँग्रेसचे माजी राज्यमंत्री भाजपवासी?