भोर मुळशी विधानसभा मतदारसंघ निवडणुका जाहीर झाल्यापासून उमेदवारी मिळवण्यासाठी विभिन्न घटकांनी केलेले शक्तिप्रदर्शन आखाड पार्टी आणि छुप्या मार्गाने केलेली मदत या सर्व गोष्टी वारंवार सुरू असताना प्रचाराची सांगता झाली. त्यानंतर तीनही तालुक्यांमध्ये स्थानिक पातळीवरती कडक कपडे घालणाऱ्यांच्या गाड्या फिरू लागल्या आहेत. रात्री अप रात्री गाड्यांचे ताफे येत आहेत. यामध्ये राखणदार आणि वाटपदार ओळखता येत नसला तरी सुद्धा पुणे शहरातील हाकेच्या अंतरावर असलेल्या या तीनही तालुक्यांमध्ये विकासासाठी खरा जनसेवेचा पॅटर्न कधी येणार हीच आसुसलेल्या चेहऱ्यावरची भावना मात्र कुणाला कळेल असे वाटत नाही.






शक्ती प्रदर्शनाच्या नावाने करोडोची उधळण ही झाली परंतु याच तालुक्यातील माता भगिनी तरुण यांचे अंधारलेले भविष्य आणि दुर्जर वास्तूमध्ये आयुष्याचा शेवटाची वाट बघणाऱ्या त्या दुर्बल विकासाची वाट पाहणाऱ्या आर्त चेहऱ्याकडे ज्येष्ठांना मात्र कोणताही शब्द टाकण्याची संधी नाही. छत्रपती शाहू महाराजांच्या स्वराज्याची स्थापना ज्या रायरेश्वराच्या शपथेने झाली त्याच रायरेश्वराच्या अधिवासात आज त्या छत्रपतींच्या मावळ्यांचे वंशज आपल्या अस्तित्वाची लढाई लढत असताना त्यांची भावी पिढी मात्र कोणत्या पालख्या वाहत आहेत आणि हा छत्रपतींचा मुलुख आगामी काळात कसा असेल याची पर्वाच करत नसल्याने महागड्या गाड्यांच्या आवाजात या तालुक्यातील विकास साध्य करण्यासाठी खरंच शिवछत्रपती महाराजांच्या विचाराचा छावा या तालुक्याला कधी मिळेल याचे उत्तर मात्र या प्रचारामध्ये मतदारांना मिळाले का हाच खरा प्रश्न निर्माण झाला आहे.
तालुक्याच्या विकासाचे साचलेले डबके फोडून वाहता झरा करण्यासाठी योग्य नेतृत्व संपूर्ण मतदारसंघ शोधत असताना त्याचं राजकीय चौकटीमुळे पुन्हा एकदा विकास गंगा अडकून पडेल की काय हीच खरी मतदारांना भीती आहे परंतु गणितच असं झालं आहे की आता बोलण्यासही वाव नाही! 23 नाेव्हेंबर 2018 राेजी या तालुक्याची व्यथा सांगणारा एक सुप्रसिद्ध चित्रपट रिलीज झाला त्यानंतर या भागातील संवेदना जागृत होऊन बदलाच्या दिशेने वाटचाल होण्याची शक्यता असताना सद्यकालीन परिस्थितीत मात्र ….सध्या हे चांगले! अशी मतदारांना म्हणण्याची वेळ आली आहे. भोर वेल्हा मुळशी या भागातील शेतकऱ्यांचा, जमीनींचा विषय मोठा आहे. तालुक्यात आत्तापर्यत सर्वांगीण विकास झालेला नाही हे जाज्वल्य सत्य आहे. बँका आणि साखर कारखाने प्रभावीपणे हाताळण्यात येत नाहीत. रिंग रोड प्रकल्पामुळे होणाऱ्या बदलावर आज समारोपाच्या प्रचारापर्यंत आज कोणीही बोलले नाही. डीपीडीसी मार्फत सुमारे १२५० कोटींचे विकास कामांसाठी वाटप केले जाते परंतु यापैकी किती पैसे तालुक्यांमध्ये वापरले गेले हे प्रचाराच्या दरम्यान कुठे दिसले नाही. मात्र प्रचारामध्ये ५ हजार कोटींहून अधिक निधी उपलब्ध करून देण्याचा मात्र शब्द देण्यात आला आहे.
गुंजवणी धरणाला विरोध? भूसंपादन व कामांत मलई, पायाभरणीची थाळी एका माजी आमदाराने उधळली? धरणग्रस्तांचे पुनर्वसन २५ वर्षात का झाले नाही याचे उत्तर मात्र जनतेला मिळाले नाही. या धरणाच्या भूसंपादन व धरणाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला. कमाल म्हणजे डोंगरावर ऊस शेती दाखवून भूसंपादनाचे कोट्यवधी रुपये लाटल्याचाही आरोप करत सीआयडी थांबवली असे मोठे आरोपही या प्रचारादरम्यान झाले परंतु मतदारांच्या पदरी मात्र काय पडले हा सर्वच माध्यम प्रतिनिधीला पडलेला प्रश्न आहे. धरणाचे काम पूर्ण तरी कुटुंबांचे पुनर्वसन नाही. धरणग्रस्तांच्या वसाहतीत असुविधांचा डोंगर, भूसंपादनाचे शेरेही अजून निघालेले नाहीत. या सर्व गोष्टींचा विचार करता सरते शेवटी प्रचाराच्या सांगतेला छुपा प्रचार जोरात आणि घराघरात सुरू असतानाही हक्काच्या जनसेवेचा ‘पॅटर्न’कधी सुरू होईल हा खरा प्रश्न आणि घेतलेल्या हातांना पुन्हा विकासासाठी हात उंचावरून दाद मागता येईल का? हाच खरा प्रश्न आहे.













