आम्हाला लोकांना विश्वास द्यायचा आहे की, आम्ही राज्याच्या हिताची जपणूक करणारा पर्याय तुम्हाला देतो आणि त्या पर्यायाचा कार्यक्रम लोकांसमोर देतो. निवडणुकीत लोकांची शक्ती, पाठिंबा मिळाल्यानंतर मग मंत्रीमंडळात कोणाला घ्यायचं, काय पद द्यायचं या गोष्टी ठरवता येतील, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे स्पष्टपणे सांगणं टाळलं.






देशामध्ये जयप्रकाश यांच्या सूचनेने समविचारी लोक सगळे एकत्र आले, पक्ष नंतर स्थापला. निवडणुकीला सामोरे गेले, लोकांनी शक्ती दिली , निवडून दिलं. आणि निवडून आल्यानंतर जनता पक्षाची स्थापना केली आणि त्यानंतर मोरारजी देसाई यांची निवड केली . ज्यावेळी ते लोकांकडे मत मागायला जात होते, त्यावेळी मोरारजी देसाई हे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत हे काही लोकांना सांगितलं नव्हतं, तरीही लोकांनी शक्ती दिली, ते पंतप्रधान झाले, देश चालवला असा किस्सा शरद पवार यांनी सांगितला.
विधानसभा निवडणुकांची अवघ्या काही दिवसांतच घोषणा होऊ शकते. त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही कंबर कसून ततयारी सुरू केली आहे. महायुती सरकार आणि महाविकास आघाडी दोघांनीही निवडणुकीसाठी जय्यत सुरू केली असली तरी सत्ता मिळाल्यावर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल याबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. दोघांनीही अजून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केलेला नसून त्यावरून अनेक चर्चा सुरू आहेत,अंदाज बांधले जात आहेत. मविआनं मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी केली होती. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने त्याबाबत काहीच उत्तर न दिल्याने मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे अजूनही अस्पष्ट आहे. त्यातच आजही शरद पवार यांनी मंत्रीमंडळात कोण असेल, मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा यावर भाष्य करण्यास नकार दिला.












