“मोदी साहेबांचा प्रचार मी सांगण्याची गरज नाही. प्रधानमंत्रिपदावर बसलेली व्यक्ती निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने प्रयत्न करते. पंतप्रधान एका पक्षाचा नसतो, देशाचा असतो. त्यांनी सर्व जाती,धर्म, भाषा आणि प्रांताचा विचार करायचा असतो. हे त्यांनी मुद्दाम केलं. कारण विचारधारा त्याची तशीच आहे. आज या लोकांसाठी एक प्रकारचा विश्वास देण्याची कामगिरी राज्यकर्त्यांना करावी लागते. मोदी म्हणाले की, यांच्या हातात सत्ता गेली तर तुमचं मंगळसूत्र काढून घेतील. यापूर्वी असं कधी घडलं आहे का? यांच्या हाती सत्ता आली तर तुमच्या म्हशी काढून घेतील. मोदींनी सर्व मर्यादा पाळल्या नाहीत. आम्ही राजकीय पक्ष एकमेकांवर टीका करतो. पण मर्यादा ठेवता. माझा भटकता आत्मा म्हणून उल्लेख केला. एका दृष्टीने बर झालं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आत्मा कायम राहतो. हा कायम राहणारा आत्मा तुम्हाला सोडणार नाही”, असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 25 वा वर्धापनदिन अहमदनगर येथे आयोजित करण्यात आलाय. यावेळी शरद पवार बोलत होते. यावेळी शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे खासदार उपस्थित होते.
समाजातील सर्व घटकांसाठी आणि त्यांच्या हितासाठी काम करुयात
शरद पवार म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची निर्मिती केली. त्यांनी राज्य केली. मराठी माणसाचा आत्मविश्वास वाढवला. त्यांचा उल्लेख करताना नकली बापाची शिवसेना म्हणाले. हे शोभत का? त्यांना तारतम्य राहिले नाही. सत्ता जाणार हे दिसले की माणूस अस्वस्थ कसा होतो हे दिसलं. आपण नव्या विचाराने जाऊया. समाजातील सर्व घटकांसाठी आणि त्यांच्या हितासाठी काम करुयात. निवडणुका येतील, आपण निवडणुकांना सामोरे जाऊ. मनापासून सेवा करण्याचे वचन लोकांना देऊ, असं आवाहन शरद पवार यांनी केलं.
आज ती मोदी गॅरंटी राहिली नाही, आज ते मोदी सरकार राहिलेले नाही
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, पंतप्रधानांनी शपथ घेतली, पण लोकांनी त्यांना सहमती दिली नव्हती. देशातील जनतेने त्यांना बहुमत दिले नाही. तेलगू देसम आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांची त्यांनी मदत घेतली, त्यामुळे त्याठिकाणी त्यांचे राज्य झालं. आजचे जे सरकार आहे, ते वेगळे सरकार आहे. निवडणुकीच्या काळामध्ये मोदी जाईल त्या ठिकाणी मोदी सरकार, मोदी गॅरंटी म्हणत होते. आज ती मोदी गॅरंटी राहिली नाही, आज ते मोदी सरकार राहिलेले नाही. आज तुम्ही लोकांनी तुम्ही मताच्या अधिकारावर तुम्ही सांगितलं की, हे मोदी सरकार नाही. तर इंडिया सरकार आहे. आपण पुढे जायचे आहे. महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या तीन राज्यात आपल्याला सरकार आणायचे आहे, लोकांना विश्वास द्यायचा आहे, असंही शरद पवार म्हणाले.