मेलो तरी चालेल पण कमळावर कधीही लढणार नाही; ‘या’ बड्या नेत्याच वक्तव्य

0

मेलो तरी चालेल पण कमळ, हात आणि धनुष्यबाण चिन्हावर कधीही निवडणूक लढवणार नाही असं वक्तव्य महायुतीचे परभणीतील उमेदवार आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केलं आहे. काहीही झालं तरी मी माझ्याच पक्षातून आमदार-खासदार होणार असं ते म्हणाले. परभणीतून आपणच निवडून येणार असून मनोज जरांगेंच्या अंतरवाली सराटीमधून 70 टक्के मतदान घेणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

स्वतःच्या झोपडीत राहून मालक होणं चांगलं

महादेव जानकर म्हणाले की, बारामती शहराने 2014 साली माझ्यावर आणखी जरा प्रेम केलं असत मी पवारांना हरवलं असतं. तेव्हा तर माझं चिन्हही लोकांपर्यंत पोहचल नव्हतं, वेळही मिळाला नव्हता. अनेकजण म्हणत होते की कमळ चिन्हावर लढा. पण मी ठरवलं आहे आपल्या पक्षाच्या चिन्हावर लढायचं. मेलो तरी चालेल पण कमळ, हात, धनुष्यबाण बाण चिन्हावर लढणार नाही. मी पक्ष काढलेला आहे आणि माझ्याच पक्षावर मला आमदार-खासदार व्हायचं आहे. मी युती कुणाशीही करेण.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

दुसऱ्याच्या महालात जाऊन गुलाम होण्यापेक्षा स्वतःच्या झोपडीत मालक राहणं चांगलं. माझी विचारसरणी ही वेगळी असून ती धरूनच मी इतर पक्षांशी युती करतोय असं महादेव जानकर म्हणाले.

बारामतीच्या निवडणुकीच्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी म्हटलं होतं की कमळावर लढ, पण मी त्याला नकार दिला होता असं महादेव जानकर म्हणाले. आता ही स्वतःच्या पक्षाच्या चिन्हवर मी दिल्लीत जाणार असा विश्वास महादेव जानकर यांनी व्यक्त केला.

परभणीत महादेव जानकर आणि संजय जाधव आमने-सामने

राज्यातील दुसऱ्या टप्प्यात परभणी लोकसभा मतदारसंघासाठी मतदान झालं. परभणीमध्ये महायुतीकडून महादेव जानकर तर महाविकास आघाडीकडून संजय जाधव हे निवडणूक लढवत आहेत. संजय जाधव गेल्या 10 वर्षांपासून परभणीचे खासदार आहेत. त्यामुळे विजयाची हॅटट्रीक करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. परभणी लोकसभा मतदारसंघात ओबीसी आणि मराठा समाजाची लोकसंख्या आहे. त्यामुळे लोकसंख्येचा विचार करुनच जानकर यांना उमेदवारी देण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

मराठा आंदोलनाचा परिणाम

परभणी लोकसभा मतदारसंघात मराठा आरक्षण आंदोलनाचा परिणाम दिसून आला. यावेळी मराठ्यांनी कुणाला विजयी करण्यासाठी नव्हे तर पाडण्यासाठी मतदान करावं असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं होतं.