आपचे खासदार संजय सिंह हे 3 एप्रिल रोजी 181 दिवसांनंतर तिहार जेलमधून बाहेर आले आहेत. त्यांना बुधवारी रात्री साडेआठ वाजता जेलमधून सोडण्यात आले. यानंतर संजय सिंह हे भाजपवर कडाडून टीका करत आहेत. आपचे खासदार संजय सिंह यांनी मद्य धोरण घोटाळा हा भाजपची देणगी असल्याचे म्हटले आहे. जामीन मिळाल्याच्या दोन दिवसांनंतर त्यांनी खरा घोटाळा हा ईडीच्या चौकशीनंतर सुरू झाल्याचे देखील म्हटले आहे.






यादरम्यान तिहार तुरुंग प्रशासनाने दावा केला आहे की, आपचे खासदार संजय सिंह तुरुंगात असताना त्यांचे वजन वाढले आहे. तिहार तुरुंग प्रशासनाच्या रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, 13 ऑक्टोबर 2023 रोजी जेव्हा संजय सिंह तुरुंगात पोहोचले तेव्हा त्यांचे वजन 76 किलो होते. तर तुरुंगातून बाहेर पडताना त्यांचे वजन 82 किलो होते. त्याचप्रमाणे त्याचा रक्तदाब जो आधी 153/103 होता तो 136/70 पर्यंत कमी झाला. सुमारे सहा महिने तिहार तुरुंगात असताना संजय सिंह यांचे वजन सुमारे सहा किलोग्रॅमने वाढले, तर त्यांचा बीपी कमी झाला.
शुक्रवारी माध्यमांशी बोलताना संजय सिंह यांनी मद्य घोटाळ्यामध्ये भाजपचे काही ज्येष्ठ नेते सहभागी आहेत आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एका षडयंत्राच्या अंतर्गत तुरुंगात पाठवण्यात आले आहे. यामागे आपला संपवण्याचे तसचे इलेक्टोरल बाँडमधून समोर आलेला भाजपचा खरा चेहरा लपवण्याची प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.
संजय सिंह यांनी दावा केला की मद्य धोरण घोटाळ्याचे आरोपी शरथ रेड्डी यांनी 15 नोव्हेंबर 2022 रोजी भाजपला पाच कोटी रुपये दिले. भाजप पक्ष ज्या शरथ रेड्डी यांना किंगपिन असल्याचा दावा करत होता, त्यांनी अटक झाल्यानंतर भाजपला 55 कोटी रुपयांची लाच दिली. सर्वोच्च न्यायालायामुळे भाजपलाचे मनी ट्रेल देखील समोर आले आहे, असेही संजय सिंह म्हणाले.











