अशोक चव्हाण यांच्या प्रवेशाने समीरकरणे बदलली नारायण राणे उमेदवारी नाहीच लोकसभेच्या रिंगणात?

0

काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांनी मंगळवारी भाजपमध्ये रितसर प्रवेश केला. भाजपकडून त्यांना आता राज्यसभेवर पाठवले जाणार आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या २७ फेब्रुवारीला निवडणूक होत आहे. केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे राज्यसभेतून निवृत्त झाल्याने त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार का, याकडे सगळ्याचे लक्ष लागले होते. परंतु, अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने सर्व समीरकरणे बदलली आहेत. भाजपला कोणताही धोका न पत्कारता अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवायचे आहे. उर्वरित दोन जागांवर वर्णी लागण्यासाठी भाजपमध्ये प्रचंड अंतर्गत रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे नारायण राणे आणि पियूष गोयल या दोन राज्यसभेच्या खासदारांना यंदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाणार आहे.

अधिक वाचा  अमेरिकेचा इराण पाठोपाठ चीनलाही घेरण्याचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल

प्राथमिक माहितीनुसार, नारायण राणे यांना यंदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाईल. ते रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्याविरोधात शड्डू ठोकतील. विनायक राऊत हे गेली दोन टर्म रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार आहेत. या पट्ट्यात त्यांची मोठी ताकद आहे. त्यामुळे विनायक राऊत यांना शह देण्यासाठी नारायण राणे यांच्यासारख्या आक्रमक आणि राजकारणाचा दीर्घ अनुभव असलेल्या नेत्याला लोकसभेच्या रिंगणात उतरवले जाईल.

पियूष गोयल मुंबईतून लोकसभा लढवणार

नारायण राणे यांच्याशिवाय पियूष गोयल आणि भागवतराव कराड या दोन राज्यसभेतील खासदारांना यंदा लोकसभेच्या रिंगणात उतरवले जाईल. यापैकी पियूष गोयल यांना मुंबईतील एखाद्या सुरक्षित  मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यास सांगितले जाईल. तर राज्यसभा निवडणुकीत अशोक चव्हाण वगळता आणखी तीन जागांवर भाजपकडून उमेदवार उभे केले जातील. यापैकी एका जागेवर काँग्रेसचे माजी नेते हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. हर्षवर्धन पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर बऱ्याच काळापासून कोणती मोठी जबाबदारी किंवा पद मिळालेले नाही. त्यामुळे त्यांना राज्यसभेवर पाठवून त्यांचे पुनर्वसन केले जाऊ शकते.

अधिक वाचा  नितीश कुमारांचा राजीनामा अन् बिहारमध्ये उलथापालथ; भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी नव्या नावाची घोषणा

भाजप राज्यसभेच्या चौथ्या जागेवरही उमेदवार देण्याची शक्यता

राज्यातील सध्याच्या पक्षीय बलाबलानुसार राज्यसभेच्या सहा जागांपैकी तीन जागा भाजप, एक जागा शिंदे, एक जागा अजितदादा गट आणि एका जागेवर काँग्रेसचा उमेदवार विजयी होईल. परंतु अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसच्या काही आमदारांकडून क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपने चौथ्या जागेवरही उमेदवार उतरवण्याचा जुगार खेळल्यास त्यांना विजय मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.