‘कर्नाटकच्या निवडणुकीत मिशन लोटस भाजप यशस्वी करू शकली नाही. त्यामुळे आगामी काळात भाजप व मोदींची जादू चालणार नाही, हे सिद्ध झाले आहे. २०२४ च्या निवडणुकीत मोदींविरोधात २० पक्ष एकत्र येऊन लढणार आहोत. या निवडणुकीत भाजप सत्तेतून हद्दपार होईल,’ असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.






दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या जाणार असून, भाजपविरोधात एकच उमेदवार दिला जाईल. येत्या १३ जूनला काँग्रेसची बैठक होणार असून, त्यामध्ये जागांबाबत चर्चा होईल, असे त्यांनी सांगितले. काँग्रेस भवनात आढावा बैठकीनंतर श्री. चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
चव्हाण म्हणाले, ‘मोदींच्या नऊ वर्षांच्या कारभारावर काँग्रेस अंकुश ठेवणार आहे. महागाई, बेरोजगारी, महिला, युवतींवर अन्याय, अत्याचार, शेतकरी प्रश्नांकडे झालेले दुर्लक्ष, उद्योगधंद्यांची झालेली पिछेहाट आदी मुद्यांवरून मोदी सरकारला घेरणार आहोत. काँग्रेसने संघटित लढा दिल्यास मोदींचा पराभव होऊ शकतो. कर्नाटक निवडणुकीत भाजप आणि मोदी यांचा पराभव झाल्याने भाजपने वेगवेगळी अभियाने सुरू केली आहेत.’
‘देशात मोदींविरोधात २० पक्ष एकत्र येणार असून, २०२४ च्या निवडणुकीत भाजप आणि मोदी हटाव हा एककलमी कार्यक्रम राबवला जाणार आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या जाणार असून, भाजपविरोधात एकच उमेदवार देण्याचा प्रयत्न असेल. मतविभागणी टाळल्यास भाजपचा पराभव अटळ आहे.’
राज्यात लोकसभेच्या ४८ जागांच्या वाटपात महाविकास आघाडीत तिन्ही घटकांना बरोबर घेऊन जावे लागणार आहे. जागा वाटपावर दिल्लीत शिक्कामोर्तब होईल. दोन हजारांच्या नोटा बंद करून नेमके मोदींनी काय साधले? मुळात दोन हजारांच्या नोटा काढायची गरजच नव्हती. संजय राऊत यांच्या वैयक्तिक वादावर मी बोलणार नाही. मात्र, शिवीगाळ, असभ्य वर्तन कोणी करू नये, असंही चव्हाण म्हणाले.
रेल्वेमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा..
ओरिसा राज्यातील रेल्वे अपघाताची सीबीआय चौकशी सुरू असली तरी यापूर्वी अनेक अपघाताच्या चौकशीत वर्षानुवर्षे चार्जशीट दाखल झालेले नाही. त्यामुळे हे सगळे सीबीआयकडे ढकलून केंद्र सरकार आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत आहे. रेल्वेच्या सुरक्षेत दुर्लक्ष झाले असून, सुरक्षा यंत्रणेसाठी वास्तवात किती खर्च केला, किती निधी इतरत्र वळवला? हेही महत्त्वाचे आहे.
या अपघाताबाबत व रेल्वेच्या सुरक्षेबाबत सभागृहासमोर व जनतेपुढे भूमिका मांडणे गरजेचे आहे. रेल्वेच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्याची नैतिक जबाबदारी घेऊन रेल्वेमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी श्री. चव्हाण यांनी केली.
ब्रिजभूषण यांच्यावर कारवाईला मोदी सरकार घाबरतेय
महिला कुस्तीगिरांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी सात तक्रारी दिल्ली पोलिसांत दाखल आहेत, असे सांगून श्री. चव्हाण म्हणाले, ‘‘खासदार ब्रिजभूषण सिंह यांना कायद्याप्रमाणे अटक केली पाहिजे; पण भाजपचा उत्तर प्रदेशातील तो दबंग, बाहुबली खासदार असून, ठाकूर समाजातील आहे.
अनेक जिल्ह्यात त्यांचा राजकीय प्रभाव आहे. त्यामुळे मोदींचे सरकार त्यावर कारवाई करण्यास घाबरत आहे. स्वत: पंतप्रधानांनी याविषयी चाकर शब्द काढलेला नाही. यातून मोदींचा ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’चा नारा फेल ठरत आहे. त्यांना अटक करून कडक शिक्षा झाली पाहिजे. या मुद्यावर काँग्रेसच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे.













