आगामी लोकसभा निवडणूकीचे वारे सध्या राजकीय वर्तुळात वाहू लागले आहे. सत्ताधारी पक्षांसह विरोध पक्ष कंबर कसत आहेत. सर्वच पक्षांना लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आपली तयारी सुरु केला आहे. अशातच लोकसभेसाठी अनेक जागांची अदलाबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांना हक्काचा मतदारसंघ सोडावा लागणार अशा चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातून सलग दोनदा खासदार असणारे श्रीकांत शिंदे ठाण्यातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. श्रीकांत शिंदे खासदार असलेल्या मतदारसंघातून रवींद्र चव्हाण यांना उतरवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गट देखील मुंबईतील लोकसभा निवडणुकीसाठी 6 पैकी 4 जागा लढण्यासाठी आग्रही आहे. यामध्ये उत्तर मुंबई (महाविकास आघाडी मित्र पक्ष), उत्तर पश्चिम (ठाकरे गट), उत्तर मध्य (महाविकास आघाडी मित्र पक्ष), दक्षिण मध्य मुंबई (ठाकरे गट (वंचित)), दक्षिण मुंबई (ठाकरे गट), ईशान्य मुंबई (ठाकरे गट) या जागांचा समावेश असू शकतो.
उत्तर पश्चिममध्ये गजानन कीर्तिकर यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून अमोल कीर्तिकर यांच नाव निश्चित झालं आहे. अमोल कीर्तीकरांसाठी कार्यकर्ते तयारीला सुद्धा लागले आहेत. त्यामुळे सुनील प्रभू यांचा विचार केला याची शक्यता फारच कमी आहे.
दक्षिण मध्य मुंबईत सध्या खासदार राहुल शेवाळे शिंदे गटात आहेत. त्यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीला जागा दिली जाऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे. अमरावती लोकसभा निवडणुकीत अमरावतीची जागा काँग्रेस मागण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीकडे असलेल्या अमरावती लोकसभेवर काँग्रेस व ठाकरे गटाचा दावा आहे. काँग्रेसकडून आमदार बळवंत वानखडे तर ठाकरे गटाकडून ज.मो.अभ्यंकर व दिनेश बुब यांच्या नावाची चर्चा सध्या आहे.
विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात माविआ आक्रमक असून विचारधारा सोडल्याने अल्पसंख्याक व दलित मतदारांची खासदार नवनीत राणा विरोधात नाराजी आहे. अमरावतीत लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत अमरावती मतदारसंघ काँग्रेस मागणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.