दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारताच ते काहीसे भडकले. तसेच त्यांनी PM मोदींच्या कौतुकाचा पाढा वाचला.
शिंदे म्हणाले, “देशात कोणीही कोणाला भेटू शकतं, अशा भेटींना काहीही प्रॉब्लेम नाही. पण असं कोणीही भेटल्यानं निवडणुका जिंकता येत नाहीत. यापूर्वी देखील सर्व पक्षांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला आहे. पण देशाला पुढे न्यायचं असेल तर मोदींच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही. त्यामुळं अशा बैठकीनं काहीही फरक पडत नाही.
सध्या G20चं अध्यक्षपद भारताकडं
सध्या आपल्या देशाचा विकास जगासमोर आहे. इतक्या देशांची अर्थव्यवस्था अडचणीत असतानाही आपली अर्थव्यवस्था ११व्या स्थानावरुन पाचव्या स्थानावर कोणी आणली? पंतप्रधान मोदींनीच! हे तर सर्वांच्या समोर आहे. जग आपल्या देशाचा सन्मानं करतंय ही तर चांगली गोष्ट आहे. यासाठी विरोधक थोडेच चांगलं बोलणार आहेत. जनतेला माहिती आहे की, देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी शेतकऱ्यांसाठी, समाजाच्या प्रत्येक घटकांसाठी मोदी काम करत आहेत, ते जो निर्णय घेतला तो जगासमोर आहे. सध्या G20 चं अध्यक्षपद भारताला मिळालं आहे याचा अर्थ आपल्या देशाची प्रगती होत आहे.
यंदाच्या लोकसभेत सर्व रेकॉर्ड मोडतील
नव्या उंचीवर आपली अर्थव्यवस्था जात आहे. 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं ध्येय आपल्याला गाठायचं आहे. त्यामुळं विरोधीपक्षानं सहकार्य करायला पाहिजे. जनतेला माहिती आहे की, इतक्या वर्षांत देशाला कोणी लुटलं आहे. गेल्या ९ वर्षांत जे काही झालं ते ७० वर्षात आपल्याकडं झालं नाही. त्यामुळं जनता बरोबर निर्णय घेईल. आत्तापर्यंत लोकसभा निवडणुकीचे जे निकाल आहेत ते येत्या निवडणुकीत तुटतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.