काकांच्या अंत्यविधीहून परतताना काळाचा घाला, समृद्धी महामार्गावर चौघा भावांचा अपघाती मृत्यू

0

दोन दिवसांपूर्वी तेलंगणा येथे काकांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम आटोपून सुरतकडे जाणाऱ्या भावंडांवर काळाने घाला घातला. चारचाकी कार चालकाला डुलकी लागल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी दुभाजकावर आदळून भीषण अपघात झाला. यात तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाला उपचारादरम्यान प्राण गमवावे लागले. ही घटना बुधवार दि.२४ रोजी पहाटे तीन वाजता समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर येथे करमाड- शेकटा गावाजवळ घडली.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, संजय राजणभाई गौड वय ४३, कृष्णा राजणभाई गौड वय ४४, श्रीनिवास रामू गौड वय ३८, सुरेशभाई गौड वय ४१ (सर्व रा. लेफ सिटी करडवा, सुरत, गुजरात) असे अपघातात मयत झालेल्या चौघा चुलत भावंडांची नावे आहेत.

अधिक वाचा  नगराध्यक्षांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत आनंदाची बातमी, सदस्यत्व व मताधिकार सरकार हा अध्यादेश काढणार

गौड कुटुंबीय सुरत येथे कपड्याचा व्यवसाय करतात. गौड कुटुंबातील एका वयोवृद्ध व्यक्तीचा तेलंगणा येथे मृत्यू झाला होता. काकांच्या अंत्यविधीसाठी चारही भावंडं अर्टिगा या चारचाकी वाहनाने गेले होते. अंत्यविधीचा कार्यक्रम आटोपून चारही भावंडं घवू सुरतकडे निघाले होते.

दरम्यान करमाड – शेकटा येथील समृद्धी महामार्गावर गौड कुटुंबियांच्या वाहन चालकांचे नियंत्रण सुटले. डुलकी लागल्याने त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. यावेळी भरधाव वेगात असलेली चारचाकी दुभाजकावर धडकली. या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्याने अखेरचा श्वास घेतला. गाडीत मागे बसलेला मुलगा अपघातातून बचावला आहे. दरम्यान या प्रकरणी करमाड पोलिस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत.

अधिक वाचा  मोठा ट्विस्ट! दोन्ही राष्ट्रवादींच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी, अजित पवारांचा प्रस्ताव शरद पवार मान्य करणार?

या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. आवाज ऐकून नागरिक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान जखमींना तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.