पप्पांनी सांगितलं काही बरे वाईट झाले तर आई व विराजची काळजी घे, विष्णू चाटेचा फोन आलाय: वैभवीचा जबाब

0
1

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांवर आरोप निश्चिती करून सदर दोषारोपपत्र गुन्हे अन्वेषण विभाग आणि विशेष तपास पथकाने बीडच्या न्यायालयात सादर केले आहे. या दोषारोपपत्रातून नवनव्या गोष्टी समोर येत आहेत. दोषारोपपत्रात देशमुख यांना मारतानाचे मारेकऱ्यांचे फोटो पाहून संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला होता. त्यानंतर आता दोषारोपत्रातील देशमुख यांची लेक वैभवीचा पोलीस जबाबही समोर आला आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्येचे मूळ आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणात असल्याचे स्पष्ट झाले आहे. देशमुख यांनी खंडणी प्रकरणात मध्यस्थी केल्यानेच वाल्मिक आणि त्याच्या टोळीला राग आला होता. एका साध्या सरपंचाने आपली खंडणी रोखली, याचा राग मनात धरूनच कराड गँगने त्यांची हत्या केल्याचे दोषारोपपत्रातून समोर आले आहे. याचसंदर्भातील सरपंच देशमुख यांना आलेल्या विष्णू चाटेच्या फोनसंबंधीचा जबाब वैभवीने पोलिसांना दिला आहे.

अधिक वाचा  राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 14 निर्णय; मुंबई- ठाणे नविन मेट्रो मार्गिका, पुणे-लोणावळा हा निर्णय, सर्व जाणून घ्या! 

लातूरला आले, खूप अस्वस्थ होते, मी सारखं विचारत होते, पप्पा काय झालंय…?

वैभवीने पोलिसांना सांगितले, माझे काका-काकू आणि आजी-आजोबा मस्साजोगला राहायचे परंतु शिक्षणासाठी माझ्या आई आणि भावासोबत मी लातूरला राहायचे. त्यामुळे माझे पप्पा नेहमीच आम्हाला भेटण्यासाठी लातूरला यायचे. ०७ डिसेंबर २०२४ रोजी रात्री उशिरा माझे पप्पा मस्साजोग येथून लातूरला आले होते. त्या दिवशी ते बरेच अस्वस्थ असल्याचे मला दिसले. दुसऱ्या दिवशीपण पप्पा मला चिंतेत असल्याचे दिसले. मी त्यांना काय झाले म्हणून विचारले तेव्हा त्यांनी मला जवळ घेऊन सांगितले की, बाळा चांगला अभ्यास कर…

अधिक वाचा  ‘समस्त कोथरूड’ने देखाव्यांची ‘संस्कृती’च बदलली; सर्वत्र जिवंत देखावे अन् पौराणिक मंदिरे

त्यानंतरही मी त्यांना खोलात जाऊन विचारले. त्यावर ते काही सांगण्यास तयार नव्हते. परंतु मी त्यांना वारंवार विचारणा केली की, मला सांगा पप्पा काय झाले. तेव्हा त्यांनी मला ०६ डिसेंबर २०२४ रोजी आवादा कंपनीमध्ये वाल्मिक अण्णांची माणसे खंडणी मागण्याकरीता आणि कंपनी बंद करण्याकरिता कंपनीत आल्यानंतर मी त्यांना अडविले होते.

त्यामुळे त्यांना खूप राग आला होता. वाल्मिक कराड हा गुंड प्रवृत्तीचा माणूस असून त्याचा बीड जिल्ह्यात दबदबा आहे. त्याला खूप माणसे घाबरतात. तसेच त्याच्या जवळचा माणूस विष्णु चाटे हा मला सारखा फोन करुन ठार मारण्याची धमकी देत आहे. त्यामुळे मला टेन्शन आले आहे. माझे काही बरे वाईट झाले तर आई व विराजची काळजी घे, असे म्हणाले होते. त्यानंतर मी पप्पांना धीर दिला. काही काळजी करू नका. तुम्ही स्वत:साठी नाही तर गावासाठीच सगळं करताय, असे म्हणाल्याचे वैभवीने पोलिसांना सांगितले.

अधिक वाचा  कोथरूड सर्वपक्षीय गणेश विसर्जन नियोजन समिती; 17वा विसर्जन नियोजन महोत्सव…तोच उत्साह …तोच ध्यास!