महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. ११) निकाल दिला. त्यात शिवसेनेतील बंडखोर १६ आमदारांच्या अपात्रेबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी वाजवी कालावधीत (विदीन रिजनेबल टाईम’ Within Reasonable Time) निर्णय देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार आता १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निर्णय घेणार आहेत. मात्र नार्वेकर यांनी लवकरात लवकर म्हणजे काही कालमर्यादा नाही, अशी भूमिका घेऊन ठाकरे गटाचे टेन्शन वाढविले आहे. त्यामुळे या प्रकरणी ठाकरे गटावर वाट पाहण्याची वेळ येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक सल्ला दिला आहे. आबेंडकर आकोला येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.






आंबेडकर म्हणाले, “सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णायानुसार १६ आमदारांना अपात्र करण्याचा निर्णय विधानसभेचे अध्यक्षांना घ्यावयाचा आहे. त्यासाठी वेळेचे कसलेही बंधन नाही. परिणामी या प्रकरणावर निर्णय घेण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आता सभापतींना निर्णयासाठी महिनाभराची वेळ द्यावी. महिनाभरात निर्णय झाला नाही तर विधिमंडळ आणि अध्यक्षांना घेराव घालावा.
यावेळी आंबेडकरांनी ठाकरे यांना कायम पाठिंवा असल्याचे स्पष्ट केले. आंबेडकर म्हणाले, आता उद्धव ठाकरे हे पुढील काही दिवसात कोणती भूमिका घेतात, यावरच राज्याचे राजकारण अवलंबून आहे. उद्धव ठाकरे यांना मित्र पक्ष म्हणून सल्ला देत आहे. सध्या ते गोंधळलेले आहेत. गोंधळेलेल्या व्यक्तीलाच सल्ला दिला जातो. या सर्व घडामोडीत वंचित बहुजन आघाडी या संघर्षात उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहणार आहे.
आता पुर्वीप्रमाणे कोर्टातील महत्त्वाच्या निकालावर चर्चा व्हावी, अशी अपेक्षाही आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केली. ते म्हणाले, पूर्वी ८० च्या दशकात न्यायालयाच्या महत्त्वाच्या निर्णयांवर सार्वजनिक चर्चा होत असे, भाष्य केले जात होते. आता ही प्रथा बंद पडली आहे. ती पुन्हा सुरू झाली पाहिजे. सार्वजनिकरित्या निकालावर चर्चा घडून आल्या पाहिजेत.












