‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. अनेक ठिकाणी या चित्रपटाला विरोध करण्यात येत आहे. तर काही राज्यात हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावरून कार्नाटकचे राजकारणही तापले आहे. असे असतानाच आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावर पश्चिम बंगालमध्ये बंदी घालण्याची घोषणा केली आहे. तसेच एका पत्रकार परिषदेत या चित्रपटाविषयी बोलताना त्यांनी संताप व्यक्त केला आहे.






‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाची सोशल मीडियावर देखील जोरदार चर्चा असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटावर आधी तामिळनाडूमध्ये बंदी घालण्यात आली. त्यानंतर आता पश्चिम बंगालमध्येही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या चित्रपटावर बंदी आणली आहे. यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, “राज्यात शांतता राखण्यासाठी तसेच द्वेष आणि हिंसाचार टाळण्यासाठी द केरळ स्टोरी या सिनेमावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.











