दर वर्षी 31 जुलैपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव ठेवण्यात येत असले, तरी यंदा ’अल निनो’मुळे खडकवासला धरण साखळीतील पाणी 31 ऑगस्टपर्यंत पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे.यंदा पाऊस उशिरा व पावसाचे प्रमाण कमी असल्याने उपलब्ध पाण्याचा शहर व जिल्ह्यातील एक कोटी नागरिकांना, तसेच 66 हजार हेक्टर शेतीला पुरेशा प्रमाणात पुरवठा करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे आहे.






धरण साखळीत गुरुवारी (दि. 16) रोजी 12.26 टीएमसी (42.07 टक्के) पाणीसाठा शिल्लक होता. गतवर्षीपेक्षा 1.30 टीएमसी अधिक पाणी धरण साखळीत आहे. असे असले तरी गतवर्षीपेक्षा यंदा उन्हाची तीवता अधिक आहे. 40 डिग््राी सेल्सिअसवर तापमान गेले आहे. त्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे, दुसरीकडे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन वाढले आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात दर तासागणिक घट सुरू आहे. ’अल निनो’मुळे हवामान पाऊस लांबण्याची, तसेच कमी पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे आगामी साडेचार महिने पुणेकरांसह जवळपास एक कोटी नागरिकांची तहान भागविण्यासाठी जलसंपदा विभागाला कठोर उपाययोजना कराव्या लागणार आहेत.
तीव उन्हामुळे आगामी काळात जवळपास एक टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होणार आहे. पाणीटंचाईचे संकट निर्माण होऊ नये, उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे, शेतीच्या नावाखाली पाणीउपसा करणाऱ्या खडकवासला व इतर धरण तीरावरील हॉटेल, रिसॉर्ट, वॉटर पार्क, खासगी कंपन्या आदींवर कठोर कारवाई करण्यासाठी मोठी यंत्रणा जलसंपदा विभागाला उभी करावी लागणार आहे. महापालिकेने जलसंपदा विभागाकडे उन्हाळ्यात तीन महिन्यांसाठी वाढीव पाण्याची मागणी केली आहे. मात्र, याबाबत वरिष्ठ पातळीवर अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याचे खडकवासला जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे.
आतापर्यंत क्षमतेइतक्या पाण्याचा विसर्ग
खडकवासला धरण साखळीची एकूण पाणीसाठवण क्षमता 29.15 टीएमसी इतकी आहे. गेल्या वर्षी अधिक प्रमाणात पाऊस पडला, त्यामुळे 27.91 टीएमसी जादा पाणी सोडण्यात आले. जवळपास क्षमतेइतके पाणी धरण साखळीतून सोडले. याचा लाभ तीन महिने पुणेकरांसह शेती व उजनी धरणाला झाला.
वरसगाव, पानशेतमधून विसर्ग सुरू
टेमघर धरण जवळपास कोरडे पडले आहे. पानशेत व वरसगाव धरणांच्या वीजनिर्मिती केंद्राच्या सांडव्यातून खडकवासला धरणात पाणी सोडले जात आहे. त्यामुळे खडकवासलाची पाणीपातळी 50 टक्क्यांवर आहे. सध्या वरसगावमधून 600 व टेमघरमधून 500 क्सुसेक पाणी खडकवासलात सोडले जात आहे.
पाऊस कमी व उशिरा पडल्यास पाणीटंचाईचे संकट निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. पाण्याची चोरी, गळती रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे.
– गिरिजा कल्याणकर-फुटाणे, शाखा अभियंता, खडकवासला धरण विभाग
मुख्यमंत्री कार्यालयाने अल निनोमुळे उपलब्ध धरणसाठ्याचे योग्य नियोजन करून 31 ऑगस्टपर्यंत पिण्यासाठी पुरेसा प्रमाणात पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे यंदा 31 जुलैऐवजी 31 ऑगस्टपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव ठेवण्यात येणार आहे.
– मोहन भदाणे, उपविभागीय अभियंता, खडकवासला जलसंपदा विभाग










