यूपीएससीत एकही मराठी नाही; वाचन-लेखन कौशल्याअभावी स्थिती यंदाच्या निकालातील धक्कादायक चित्र

0

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षेत यश मिळविणार्‍यांच्या यादीत मराठी माध्यमातून मुख्य परीक्षा दिलेल्या उमेदवारांचा टक्का घसरतो आहे. यंदाच्या अंतिम निवड यादीतही असे उमेदवार दिसत नाहीत.वाचन आणि लेखन कौशल्याअभावी मराठी उमेदवार मागे राहत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवले आहे.

‘यंदा साधारण ३३ उमेदवारांनी मराठी माध्यमातून मुख्य परीक्षा दिली. त्यातील केवळ दोनच मुलाखतीसाठी पात्र ठरले आणि एकाही उमेदवाराची अंतिम यादीत निवड झाली नाही,’ अशी माहिती पुण्यातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकांनी दिली. यंदाच्या निकालात महाराष्ट्रातून उत्तीर्ण झालेल्या अनेक विद्यार्थ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी इंग्रजी माध्यमातून मुख्य परीक्षा दिल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे मराठीतून मुख्य परीक्षा देणारे नाव अंतिम निवडयादीत दिसत नसल्याचे चित्र अधोरेखित होत आहे.

‘यूपीएससी’च्या नागरी सेवा परीक्षेत पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे टप्पे असतात. मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना भारतीय भाषांमध्ये उत्तरे लिहण्याची मुभा असते. प्रश्न मात्र इंग्रजी आणि हिंदीत असतात. त्यात इंग्रजी भाषेची आणि हिंदी किंवा निवडलेल्या भारतीय भाषेची पात्रता परीक्षा घेण्यात येते. तसेच, सामान्य अभ्यासक्रमाचे चार आणि वैकल्पिक विषयांच्या दोन प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना सोडवायच्या असतात. शेवटी, मुलाखत आणि मुख्य परीक्षेतील एकत्रित गुणांवरून अंतिम निवड यादी प्रसिद्ध केली जाते.

अधिक वाचा  LPG गॅस सिलिंडर बुकिंगचे नियम पुन्हा बदलले, ग्रामीण अन् शहरी भागासाठी ही नवी अट लागू

‘सध्या विद्यार्थ्यांमध्ये कष्ट करण्याची तयारी कमी होताना दिसते. वाचनाची सवय नसते. त्यात लेखन कौशल्यही कमी पडत असल्याने ‘यूपीएससी’मध्ये मराठी माध्यमातील विद्यार्थी मागे पडतात. विद्यार्थ्यांचा अभ्यासासाठी व्हिडिओ बघण्याकडे कल आहे. त्यामुळे लिखाणाचा सराव होत नाही,’ असे निरीक्षण मार्गी संस्थेचे संचालक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रवीण चव्हाण यांनी नोंदवले. ‘इंग्रजी आणि गणिताच्या मूलभूत कौशल्यांच्या अभावामुळे पूर्वपरीक्षेचा अडथळा पार करण्यात मराठी विद्यार्थी मागे पडतात. त्यातूनही एखाद्याने मराठीतून मुख्य परीक्षा दिलीच, तर इंग्रजीच्या तुलनेत फारशी तयारी नसते. आता दर्जेदार संदर्भही मराठीत उपलब्ध आहेत. मात्र, प्रयत्नांची गुणवत्ता आणि लिखाणाच्या सरावात मराठी विद्यार्थी मागे पडतात,’ असे युनिक ॲकॅडमीचे तुकाराम जाधव यांनी सांगितले.

अधिक वाचा  शेतकऱ्यांना शेतमाल किंमत जोखीम व्यवस्थापनाचे ‘स्मार्ट’ धडे

मराठी माध्यमातून दोन वेळा ‘यूपीएससी’ची मुख्य परीक्षा देणारे आणि सध्या नव्या उमेदवारांना मार्गदर्शन करणारे वर्धमान बोथरा म्हणाले, ‘मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना कमी वेळेत सगळी उत्तरे लिहिण्यासाठी शर्थ करावी लागते. उलट, इंग्रजीत पेन न उचलता अधिक गतीने लिहिता येते.’ ‘मराठी माध्यमातून मुख्य परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. लेखन सरावाचा अभाव, इंग्रजीचा न्यूनगंड, भाषांतरावर भर आणि ‘यूपीएससी’ने वाढवलेली ‘सीसॅट’ची काठिण्यपातळी, यामुळे ही संख्या कमी होत आहे,’ असे मत मराठीत तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे ‘प्रयास’चे आदित्य देवरे यांनी मांडले.

‘मराठीतूनही यश मिळवता येते’

”कमी वेळेत आणि कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त आशय मांडायचा असतो, त्या वेळी भाषिक कौशल्यांचा कस लागतो. इंग्रजीतून ‘की-वर्ड्स’ आणि जास्तीत जास्त मुद्दे लिहिता येतात, असा कल आहे.

अधिक वाचा  तक्रार, पाठपुरावा, आंदोलने अन् निवेदन तरीही प्रशासन दाद देईना; आत्ता गांधीवादी कार्यकर्त्याचे ‘उपोषण’ अस्त्र

‘मात्र, अंतिम निवड करताना प्रत्यक्ष आयुष्यातील आणि व्यवस्थेतील आव्हाने समजून त्यावर काम करणारे निवडले जातात. त्यासाठी प्रशासक म्हणून सोप्या भाषेत आपले मुद्दे पटवून द्यायचे असतात. मराठीतून ही मांडणी अधिक चांगल्या पद्धतीने करता येते, स्थानिक संदर्भ देता येतात, विचार आणि लिहिण्यातील अंतर कमी होते.

‘भावनिक आणि व्यावहारिकदृष्ट्याही मराठी माध्यम सोयीचेच आहे,’ असे मत मराठी माध्यमातून मुख्य परीक्षा देऊन ‘यूपीएससी’त देशात पंधरावा क्रमांक मिळवणारे सनदी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी व्यक्त केले.

राज्यसेवा परीक्षाही लिखाणाची परीक्षा झाली आहे. त्यामुळे मराठी माध्यमातून ‘यूपीएससी’ची तयारी करणार्‍या उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी वाढतात. तसेच, मराठीतूनही इंग्रजीप्रमाणेच यश मिळवता येतेच. कोणत्या भाषेत विषय अधिक चांगल्या पद्धतीने सांगता येतो, हे ठरवले पाहिजे. – कौस्तुभ दिवेगावकर, सनदी अधिकारी