विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाची राज्यभर आंदोलन रात्री नागपुरात संघ मुख्यालय परिसरात राड्यानंतर तणावपूर्ण शांतता संचारबंदीही लागू; पोलिसही तैनात

0

नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून चांगलाच वाद पेटला. काल रात्री दोन गट आमने सामने येऊन त्यांच्यात तूफान हाणामारी झाली. नागपूरच्या महाल परिसरात औरंगजेबाच्या कबरीवरून हा राडा झाला. औरंगजेबाच्या कबर हटवण्याच्या मागणीच्या निदर्शनानंतर नागपुरात हिंसा भडकली. त्यानंतर वाहनांची जाळपोळ सुरू करण्यात आली. हल्लेखोरांनी पोलिसांवरही दगडफेक केली. त्यात काही पोलीस जखमी झाले. या हल्ल्यामुळे नागपूरमध्ये तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवत जवळपास 50 जणांना घराघरातून ताब्यात घेतलं आहे.

काल रात्री हा प्रकार घडल्यानंतर संपूर्ण शहरात तणाव असून आजची सकाळही तणावपूर्ण शांतता घेऊनच उजाडली आहे. ज्या परिसरामध्ये ही दगडफेक झाली होती, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडून संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. तीन झोनच्या जवळपास 7 ते 8 पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही संचारबंदी लावण्यात आली आहे. त्यामुळे अशा ठिकाणी पाचपेक्ष जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही, अशा सूचना पोलिसांक़ून देण्यात आल्या आहेत. सकाळपासूनच पोलिसांकडून आवाहन केलं जात आहे. रात्री 12 पासूनच ही संचारबंदी लागू करण्यात आली असून अनेक नागरिकांना याची कल्पना नसल्याने सकाळपासून शहरात अनेक ठिकाणी पोलिसांच्या गाड्या फिरताना दिसत आहेत. कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा,नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर भागात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या परिसरात संचारबंदी आहे, कोणीही घराच्या बाहेर पडू नका असं आवाहन पोलिसांतर्फे नागरिकांना केलं जात आहे.

अधिक वाचा  नाशिक ‘महायुती’च्या उमेदवारास तिरंगी लढतीत पाडण्यासाठी माझ्या पाठीशी अदृश्य शक्ती; बंडखोर प्रसाद हिरेंच्या विधानाने मोठी खळबळ

वाद का पेटला ?

औरंगजेबच्या कबरीवरून नागपुरात चांगलाच वाद पेटला. काल रात्री दोन गट आमने-सामने आले आणि नागपुरच्या महाल परिसरात जोरदार राडा झाला. काही कळायच्या आतच दगडफेक सुरू करण्यात आली, या घटनेत पोलीस जखमी झाले आहेत. वाहनांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे. वाहनांच्या काचा फुटल्या आहेत. पोलिसांकडून जमाव पांगवण्याचा प्रयत्न सुरू झाला. समाजकंटकांनी यावेळी बेभान होऊन रस्त्यावरील दिसेल ती गाडी फोडण्यास सुरुवात केली. चारचाकी आणि दुचाकी वाहने पेटवण्यात आली. त्यानंतर काही लोकांनी जेसीबी वाहन पेटवून दिले. त्यामुळे आगीचा एकच भडका उडाल्याने लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. यामुळे शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

अधिक वाचा  ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती’ योजनेत आधीच्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या १२.७१ लाख शेतकऱ्यांना फटका

मुख्यमंत्र्यांकडून शांततेचं आवाहन

या घटनेनंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शांततेच आवाहन केलं आहे.अफवांवर विश्वास ठेवू नका, सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करावं असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. आपण सातत्याने पोलीस प्रशासनाशी संपर्कात असून त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे. नागपूर हे शांतताप्रिय आणि एकमेकांच्या सुखदुख:त सहभागी होणारे शहर आहे. अशावेळी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, आणि प्रशासनाला सहकार्य करा, असंही त्यांनी नमूद केलं.