पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (११ एप्रिल) सकाळी वाराणसीला पोहोचले. वाराणसीला पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांच्या मतदारसंघात घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाची अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना या प्रकरणात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. उत्तर प्रदेश सरकारने एका अधिकृत निवेदनात ही माहिती दिली.
काय म्हणाले पीएम मोदी?
उत्तर प्रदेश सरकारने सांगितले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी बाबतपूर विमानतळावर उतरल्यानंतर पोलिस आयुक्त, विभागीय आयुक्त आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांना भेटले. शहरातील अलिकडच्या बलात्काराच्या घटनेची त्यांनी माहिती घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकाऱ्यांना कठोर कारवाई करण्याचे आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी योग्य आणि प्रभावी पावले उचलण्याचे निर्देश दिले.”
नेमकं काय घडलं होतं?
युपीतील पांडेपूर परिसरात राहणाऱ्या एक १९ वर्षीय विद्यार्थीनीवर अत्याचार झाला. ही मुलगी एका क्रिडा महाविद्यालयात प्रवेश घेण्याची तयारी करत होती. २९ मार्चला ती मुलगी एका मित्राच्या घरी गेली. तेथून परत येत असताना राज विश्वकर्मा नावाच्या दुसऱ्या एका मित्राने तिला आपल्यासोबत नेते तेथे तिला मादक पदार्थ खायला देऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर एकेक करुन २३ जणांनी सहा दिवस तिच्यावर अत्याचार केला. तिला वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये नेण्यात आले. सहा दिवसानंतर आरोपींची भूक भागल्यावर तिला सोडून देण्यात आले.
आईने दिली होती तक्रार
या प्रकरणानंतर मुलीच्या आईने लालपूर-पांडेपूर पोलिस ठाण्यात २३ जणांविरुद्ध तक्रार दिली. त्यातील १२ जणांची नावे माहिती होती. मात्र ११ जण अज्ञात होते. राज विश्वकर्मा, समीर, आयुष, सोहेल, दानिश, अनमोल, साजिद, जहीर, इम्रान, जैब, अमन, राज खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हे सर्व आरोपी हुकुलगंज व आसपासच्या परिसरातील आहेत.
१० जणांना केली अटक
तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ पावले उचलली. डीसीपी चंद्रकांत मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तीन पथके आरोपींच्या अटकेसाठी रवाना केली. त्यातील १० जणांना अटक करण्यात आले. या आरोपींच्या चौकशीनंतर इतर आरोपींची नावे समोर आली. पोलिसांनी उर्वरीत आरोपींचा शोध सुरु ठेवला आहे. याच प्रकरणाची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली.