बाबासाहेबांना विश्वरत्न घडवण्यात रामजी बाबांनी पाया घातला तर रमाईने कळस चढवला – आनंदराज आंबेडकर

0

मुंबई दि. ८ (रामदास धो. गमरे) “लहान वयात असतानाच भिवा हा बुद्धिमान आहे आणि भविष्यात तो मोठा व्यक्ती बनू शकतो हे लक्षात येताच रामजी बाबांनी भिवाची म्हणजेच बाबासाहेबांच्या शिक्षणाची भूक शमवण्यासाठी रक्ताच पाणी करून, कष्ट मेहनत करून बाबासाहेबांना शैक्षणिक वस्तू, शालेय पुस्तके दिली मातीचा गोळा असलेल्या भिवाला शिक्षणाच खतपाणी देऊन त्यांनी घडवलं, रमाई बाबासाहेबांच्या जीवनात आल्यावर तिने सून, पत्नी, आई अशी सर्व कर्तव्ये व्यवस्थित पार पाडली, बाबासाहेब परदेशी असताना आर्थिक तंगी व वैद्यकीय सेवा न मिळाल्याने त्यांची तीन मुले मातीआड करावी लागली त्यावेळी कफन घ्यायला ही पैसा नसल्याने मातेने स्वतःच लुगड फाडुन त्यात मूल गुंडाळून त्यांना दफन केलं परंतु बाबासाहेबांच मन अभ्यासावरून विचलित होऊ नये, त्यांच्या कार्यात अडसर निर्माण होऊ नये म्हणून रमाईने त्यांना कधी कोणतीही बातमी दिली नाही स्वतः दुःख पचवून मोलमजुरी करून परिवार सांभाळला, आपला नवरा बॅरिस्टर त्याला कोणी नाव ठेवू नये म्हणून काळोखात त्या लाकडं गोळा करायला आणि शेणी थापायला जात असत व त्यातूनच बाबासाहेबांना पैसे पाठवत व तटपुंज्या शिल्लक रकमेत घर चालवत, उपाशीपोटी राहून कुटुंबाचा सर्व भार त्यांनी आपल्या खांद्यावर पेलवला, चंदनापरी झीज झीज झिजल्या त्यातून त्यांना आजार ही बळावला व त्यातच त्यांनी जगाचा निरोप घेतला, आयुष्यभर फक्त त्याग हेच जीवनसुत्र बनवून माता रमाईने संपूर्ण जीवन बाबासाहेबांना व नऊ कोटी लेकरांसाठी खर्च केले, बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न घडवण्यास रामजी बाबांनी पाया घातला व आपले संपूर्ण आयुष्य त्यागणाऱ्या रमाईनेच खऱ्या अर्थाने कळस चढवला” असे प्रतिपादन प्रमुख अतिथी या नात्याने बोलत असत बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर यांनी केले.

अधिक वाचा  पुणे शहरात 42 टक्के मतदारांची नावे वगळली जाणार आठ मतदारसंघ प्रारूप मतदार यादीनुसार वगळलेली मतदारांची संख्या

बौद्धजन पंचायत समिती संलग्न मध्यवर्ती महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महासुर्याची सावली त्यागमूर्ती माता रमाई यांचा १२७ वा जयंतीमहोत्सव उपसभापती विनोद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा परेल, मुंबई – १२ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमा आरंभी धार्मिक विधी संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार व संस्कार समितीचे सरचिटणीस मनोहर बा. मोरे यांनी सुमधुर वाणीने पार पाडला, तर पाहुण्यांचे स्वागत मध्यवर्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा सुशीलाताई जाधव व उपाध्यक्षा प्रमिलाताई मर्चंडे यांनी केले तसेच कार्यक्रमाचे प्रस्ताविक आणि सूत्रसंचालन मध्यवर्ती महिला मंडळाच्या सरचिटणीस अंजलीताई मोहिते यांनी सालस वाणीने अत्यंत प्रभावीपणे केले.

अधिक वाचा  हरित पुणे १०८ कोटी लाटले पण १० टक्केच काम; काँग्रेस गटनेते ॲड. चंदूशेठ कदम यांच्याकडून कारभार चव्हाट्यावर

 

भारतीय बौद्ध महासभा, मुंबई प्रदेश कोषाध्यक्षा दीप्ती लोखंडे या प्रमुख वक्ता या नात्याने बोलत असताना यांनी माता रमाईच्या जीवनपटाची माहिती देताना अगदीच प्रभावीपणे परंतु सर्वसामान्य सर्वांनाच कळेल अश्या साध्या, सोप्या शब्दांत मांडणी करत, रमाईने जीवनातील संघर्ष, गरिबी, दुःख यांच्याशी एकहाती लढत असताना केलेला त्याग, कुटुंबाचा भार सांभाळताना होणारी ओढताण हे सर्व सहन करून पचवून, बाबासाहेबांना कश्याप्रकारे साथ दिली, बाबासाहेबांकडे शिक्षणाची मागणी करून त्या शिकल्या, शिक्षण हे क्रांती आहे म्हणून आपल्या पतीला उच्चशिक्षणासाठी प्रोत्साहन देऊन स्वतः सर्व दुःख सहन करून बाबासाहेबांना पुढे पाठवलं हा मोठा त्याग आहे, तो त्याग प्रत्येक महिलेने समजून घेतला पाहिजे तरच प्रत्येक महिला एक चांगल कुटुंब घडवू शकते असे आपले विचार मांडले. समितीचे उपसभापती व कार्यक्रमाचे अध्यक्ष विनोद मोरे यांनी माता रमाईच्या अनेक आठवणींना उजाळा देत रमाई आजारी असताना त्या बाबासाहेबांच्या आजोळी गेल्या असता तेथील अनाथाश्रमातील मुलांना सरकारी शिधा न आल्याने उपासमार होत होती त्यावेळी स्वतःच्या हातच्या पाटल्या विकून त्यांनी मुलांच्या जेवणाची सोय केली अश्या माता रमाई शेवटच्या क्षणापर्यंत केवळ इतरांसाठी जगल्या व इतरांसाठी झिजल्या अशा अनेक आठवणींना उजाळा देत त्यांनी सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या, तद्नंतर सरचिटणीस राजेश घाडगे आणि कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांनीही माता रमाईच्या आठवणी ताज्या करीत आपले मौलिक विचार मांडून शुभेच्छा दिल्या.

अधिक वाचा  राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र? २९ ऑगस्टला मुंबईतच निर्णय? याभेटीमुळे पवारांचे मोठे पाऊल

सदर कार्यक्रमास उपकार्याध्यक्ष मनोहर स. मोरे, उपसभापती विनोद मोरे, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, सरचिटणीस राजेश घाडगे, खजिनदार नागसेन गमरे, श्रीधर साळवी, यशवंत कदम, महेश तांबे, प्रकाश कांबळे, संदेश खैरे, राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, महेंद्र पवार, भागूराम सकपाळ, अतुल साळवी, विजय तांबे, निनाद जाधव, निवडणूक मंडळाचे मिलिंद जाधव, सिद्धार्थ कांबळे, सुशीलाताई जाधव, प्रमिलाताई मर्चंडे, अंजलीताई मोहिते, ज्योती तांबे, सुजाता पवार, रेश्मा जाधव, सायली साळवी, प्रज्ञा जाधव, मानसी जाधव, सरोजनी शिरगावकर, माधवी मोहिते, नीता जाधव, सोनाली गायकवाड, उपासक, उपासिका, बौद्धाचार्य, बौद्धाचार्या व शिवडी गटक्रमांक १३ च्या रमाई महिला मंडळाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्या, सभासदा आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरतेशेवटी अंजलीताई मोहिते यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.