गुलाबराव पाटील यांनी दिला शब्द ; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित पवार यांचा ड्रीम प्रोजेक्ट मी पूर्ण करणार

0

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले. यानंतर देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्रि‍पदी विराजमान झाले. तर अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर १५ डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. यानंतर हिवाळी अधिवेशनाची सांगता होताच रात्री उशीरा खातेवाटप करण्यात आले. या खातेवाटपामध्ये शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांना पाणीपुरवठा खातं देण्यात आले. यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

गुलाबराव पाटील यांची पाणीपुरवठा मंत्री म्हणून वर्णी लागल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पाणीपुरवठा खाते मिळाल्याने आनंद व्यक्त केला. त्यासोबतच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांचा ड्रीम प्रोजेक्ट मी पूर्ण करणार असल्याचा शब्द गुलाबराव पाटील यांनी दिला.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

प्रलंबित असलेल्या योजनांना गती देणार
“माझ्याकडे पूर्वी असलेलं खातंच पुन्हा मला मिळाला आहे. मला पुन्हा पाणीपुरवठा हे खाते मिळाल्याने आनंद झाला आहे. राज्यात पाणीपुरवठाच्या काही योजना या पूर्ण झाल्या आहेत. तर काही योजना अद्याप प्रलंबित आहेत. या पाच वर्षाच्या काळात पाणीपुरवठा योजनेचा मला अनुभव असल्याने प्रलंबित असलेल्या योजनांना गती मिळेल. तसेच ग्रामीण पाणीपुरवठा हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा विषय असतो. त्यामुळे माझ्यावर पुन्हा विश्वास टाकून मला हे खात देण्यात आलं, याचा आनंद आहे”, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

“राज्यात पाणीपुरवठ्याच्या जवळपास सर्व योजना पूर्ण करण्याचा निर्धार मी केला आहे. मात्र काही ठिकाणी ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे पाणीपुरवठा योजनांची कामे हे संथ गतीने सुरू आहेत. मात्र आता जी कोणती कामे थांबले आहेत, त्या पुन्हा कशा सुरु करता येतील यासाठी प्रयत्न करणार आहे”, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

“ग्रीड मराठवाडा हा देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा महाराष्ट्रातील स्वप्नातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. मराठवाडा ग्रीड हा प्रकल्प 30 हजार कोटींचा आहे. केंद्राच्या मंजुरीच्या आशेवर त्याचा डीपीआर आम्ही तयार केला आहे. या योजनेमुळे मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे. विशेष म्हणजे हा प्रकल्प पूर्ण झाल्यास आयुष्यभर माझेही नाव त्याला जोडलं जाणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा खात्यात मला पुण्याचे काम करण्याची संधी मिळाली आहे”, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

मराठवाडा वॉटर ग्रीड योजना काय?
कमी पावसाचा प्रदेश असलेल्या मराठवाड्यात सन २०१२ ते १६ या कालावधीत सतत कमी पाऊस पडला. यामुळे येथील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. लातूर शहराला तर चक्क रेल्वेने कृष्णा खोऱ्यातील मिरज (जि. सोलापूर) येथून पाणीपुरवठा करावा लागला होता. मराठवाड्यातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी मोठ्या धरणापासून भूमिगत पाइपलाइनद्वारे २८ ठिकाणच्या जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी आणणे आणि हे शुद्ध पाणी पाइपलाइनद्वारे सर्व गाव आणि शहरांना देण्याची ही योजना आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन