आईचं निधन आणि डोळ्यापुढे काळोख तरी खचली नाही अन् डगमगलीही नाही; इंदापूरची शामल भगत बनली कलेक्टर

0

नशिबात जे काही लिहिलं असेल तेच घडतं असं म्हणत आपल्याकडे समोर येईल त्या परिस्थिती तडजोड करून आयुष्याचा प्रवास सुरू ठेवला जातो. पण काहीजण असेही असतात की कितीही खडतर परिस्थिती आली, तरी न डगमगता त्याला तोंड देत नशिबाला झुकवून हवं ते मिळवतात. पुणे जिल्ह्यातील शामल भगत ही तरूणी अशाच लढणाऱ्यांपैकी एक. दहावी झाल्यानंतर लग्नासाठी आलेलं स्थळ नाकारत तिने बंडखोरी केली आणि आता ती थेट आयएएस झालीय. नुकतंच यूपीएससीचा निकाल लागला असून वयाच्या 24 व्या वर्षी शामल भगत हिने देशात 258 वा क्रमांक पटकावत आयएएस होण्याचं स्वप्न पूर्ण केलं.

शामल भगत ही तरूणी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील नीरा नदीच्या काठी वसलेल्या भगतवाडी या गावची. वडील कल्याण भगत हे शेती आणि रंगकाम करण्याचा व्यवसाय करतात. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत चौथीपर्यंतचं शिक्षण घेतलं.

अधिक वाचा  सरकारचा मास्टरस्ट्रोक! रातोरात ‘नारी शक्ति वंदन अधिनियम’ निघाला अध्यादेश, देशभरात महिला आरक्षण लागू, पण अजून ट्विस्ट बाकी

शाळा ते महाविद्यालयापर्यंत पहिला क्रमांक

त्यानंतर शेजारच्या निरनिमगावात माध्यमिक शिक्षण झालं. लहानपणापासूनच हुशार असलेली शामल दहावीत शाळेत पहिली आली. त्यानंतर बारावीपर्यंतचं शिक्षण सराटी गावातील जिजामाता विद्यालय येथे झालं. तिथेही तिने पहिला नंबर काही सोडला नाही. पुण्यातील महात्मा फुले कृषी महाविद्यालयात बी.एसस्सी अॅग्रीची पदवी पूर्ण केली. त्यावेळी तिने विद्यापीठाचं सुवर्ण पदकही पटकावलं होतं.

विशेष म्हणजे दहावी झाल्यानंतर शामलला तिच्या कुटुंबीयांनी लग्नासाठी स्थळ काढलेलं. पण शामलने त्याला विरोध करत शिक्षण पूर्ण करण्याचा पवित्रा घेतला होता.

आईचं निधन आणि डोळ्यापुढे काळोख

शिक्षणामध्ये हुशार असलेल्या शामलने पहिल्यापासून कलेक्टर होण्याचं निश्चित केलं होतं. पहिल्या प्रयत्नात तिला पूर्व परीक्षेत यश आलं नाही. मग दुसऱ्यावेळी प्रचंड मेहनत घेतली. पहिल्या वेळी अपयश का आलं याची कारणं शोधून त्यावर काम केलं आणि दुसऱ्या प्रयत्नात मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली.

अधिक वाचा  अनुसूचित जाती ‘उपवर्गीकरणा’चा मातंगांना फटका; हरिजन व मातंग जातीच्या आकडेवारीत तफावत ‘बार्टी’ अहवालात संशय व्यक्त

मुलाखतीच्या तारखा समोर असताना शामलच्या आईचं कर्करोगानं निधन झालं. ज्या आईने आपली मुलगी कलेक्टर व्हावी असं स्वप्न पाहिलं होतं, तीच आता अशी अर्ध्यावर सोडून गेल्याने शामलच्या डोळ्यापुढे काळोख निर्माण झाला. पण आलेल्या परिस्थितीला जिद्दीने तोंड देण्याची शामलची लहानपणापासूनची सवय. त्यामुळे शामल या दुःखातूनही सावरली आणि मुलाखतीला गेली.

कोणताही क्लास न लावता यूपीएससी उत्तीर्ण

अखेर यूपीएससीचा निकाल लागला आणि शामल देशात 258 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. शामलने आपल्या आईचं स्वप्न पूर्ण केलं, आपल्या गावाचं नाव देशभरात पोहोचवलं. तिच्या या यशात तिच्या कुटुंबीयांचा, भावंडांचा मोठा हातभार आहे. ग्रामीण भागातली मुलगी, कोणताही क्लास न लावता यूपीएससीसारखी परीक्षा यशस्वी झाली. त्यामुळे शामलचं यश हे अधिक झळाळून निघतंय.

अधिक वाचा  ‘पल्टीमार’ ते जुळवाजुळवीचे तज्ज्ञ, महिला सशक्तीकरण इन्फ्रास्ट्रक्चर मॅनचा प्रवास; २० वर्षांच्या कारकिर्दीचा आढावा!

सर्वकाही नशिबावर अवलंबून आहे असं म्हणणाऱ्यांसाठी शामल भगत एक मोठं उदाहरण आहे. आपण ठरवलं तर काहीही करू शकतो, कोणत्याही परिस्थितीवर मात करू शकतो आणि आपलं नशिब बदलवू शकतो हाच संदेश तिने युवक-युवतींना दिला आहे.