‘वंचित’ची पाचवी यादी जाहीर, 10 उमेदवारांची नावे जाहीर, कुणाकुणाला संधी?

0

वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी पाचवी यादी आज जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 10 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या यादीत मुंबईच्या तीन जागांचा समावेश आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी नुकतंच याबाबत प्रतिक्रिया दिलेली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे महायुतीत सहभागी होतात का? त्यांची भूमिका काय असेल? ते पाहण्यासाठी आतापर्यंत उमेदवार घोषित केले नव्हते. आता मनसेने महायुतीला पाठिंबा दिल्याने आपण मतांच्या गणितानुसार उमेदवार जाहीर करु, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. त्यानंतर आता मुंबईतील तीन लोकसभा मतदारसंघांचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई उत्तरच्या जागेसाठी बीना सिंह यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मुंबई उत्तर पश्चिममधून संजीवकुमार कलकोरी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर दक्षिण मध्य मुंबई मधून अब्दुल खान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

अधिक वाचा  ‘पल्टीमार’ ते जुळवाजुळवीचे तज्ज्ञ, महिला सशक्तीकरण इन्फ्रास्ट्रक्चर मॅनचा प्रवास; २० वर्षांच्या कारकिर्दीचा आढावा!

वंचितकडून रायगड लोकसभेच्या जागेसाठी कुमूदानी चव्हाण यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर धाराशिवमधून भाऊसाहेब अंधाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नंदुरबारमधून हनुमंत कुमार सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर जळगाव लोकसभा मतदारसंघातून प्रफुलकुमार लोढा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून गुलाब बर्डे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. पालघरमधून विजय म्हात्रे तर भिवंडीमधून निलेश सांबरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची महाविकास आघाडीसोबत चर्चा फिस्कटल्यानंतर त्यांनी राज्यातील सर्वच मतदारसंघांवर उमेदवार उतरवणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. वंचितला या निवडणुकीत कितपत यश मिळतं ते पाहणं महत्त्वाचं असेल. वंचितला गेल्या निवडणुकांमध्ये मिळालेल्या मतांची आकडेवारी पाहता या पक्षाकडे डोळेझाक करणं महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांना धोक्याचं ठरु शकतं. विशेष म्हणजे वंचितच्या उमेदवारांमुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना फटका बसू शकतो.

अधिक वाचा  मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा राजीनामा २० वर्षांनी नवा चेहरा; नेता निवडीस भाजपाची ही अडसर? कोणाच्या गळ्यात माळ?