मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतल्यानंतर आता ते मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. गेल्या २० वर्षांपासून बिहारचे मुख्यमंत्री असलेले नितीश कुमार आज राज्य सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक घेत आहेत. या बैठकीनंतर ते लोकभवन इथं राज्यपालांकडे राजीनामा सोपवतील. नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर दुपारी भाजपच्या आमदारांची बैठक झाल्यानंतर नेत्याची निवड होईल. भाजपचा गटनेता एनडीए सरकारचा नवा मुख्यमंत्री असणार आहे.






बिहारमध्ये पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास केली जाणार आहे. भाजप आमदारांच्या बैठकीत केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान हे मुख्यमंत्री कोण हे जाहीर करतील. एनडीएकडून जे नाव निश्चित केले जाईल त्या नावाला पाच पक्षांचे आमदार अनुमोदन देतील.
एनडीए आमदारांच्या बैठकीनंतर नव्याने निवड केलेले गटनेते राज्यपालांच्या भेटीला जातील. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून ते सरकार स्थापनेचा दावा करतील. बुधवारी सकाळी बिहारच्या नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. यात पाच पक्षांचे काही मंत्रीही शपथ घेतील. या शपथविधीला दिल्लीतील भाजप आणि एनडीएच्या घटक पक्षातील वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती असण्याची शक्यता आहे.
नितीश कुमार यांच्यानंतर बिहारच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अनेक नावं चर्चेत आहेत. यात सम्राट चौधरी यांचं नाव आघाडीवर आहे. याशिवाय नित्यानंद राय, विजय सिन्हा, जनक राम, रेणु देवी यांचीही नावं चर्चेत आहेत. सध्या सम्राट चौधरी हे उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र भाजप नेहमीप्रमाणे धक्कातंत्र वापरून नवा चेहरा देण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांना भाजपच्या गटाचे नेते आणि उपनेते म्हणून निवडलं होतं. त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी जर आता नवा नेता निवडायचा असेल तर भाजप गटनेता बदलू शकते. दुसरीकडे जदयूच्या गटनेते पदाच्या शर्यतीत विजय कुमार चौधरी यांचं नाव आघाडीवर आहे.










