नाशिकनंतर आता धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून देखील भाजप व शिवसेनेत वादाची ठिणगी पडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात आगामी सर्व निवडणूका एकत्र लढण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत घेतला असल्याचे सांगितले. मात्र, नेत्यांमध्ये धुसफुस पाहायला मिळत आहे. अशातच युतीच्या बिघाडीची चर्चा सुरु असतानाच भाजपचे हायकमांड महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहे.
दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी, राज्यात आगामी सर्व निवडणूका (ज्यात लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा समावेश होतो) शिवसेना आणि भाजपने एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
दरम्यान, आता अमित शाह पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे राजकीय गोटात हालचालींना वेग आला आहे. भाजपला ९ वर्ष पुर्ण झाल्या निमित्त नांदेड येथे सभा घेण्यात येणार आहे. पण राजकीय गोटात वेगळीच चर्चा रंगली आहे. लोकसभा विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये हालचालींना वेग आला आहे.
नाशिकनंतर आता धाराशिवमध्येही युतीत बिघाडी
नाशिकमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून लोकसभेच्या जागेवर दावा करण्यात आला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत विद्यमान शिवसेना खासदाराला गद्दार असे अप्रत्यक्षपणे म्हणत या भाजप इच्छुकानं जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेनेचं स्वतंत्र अस्तित्व आहे, आम्हाला सहज घेऊ नका असा इशारा राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी भाजपाला दिला आहे.