पूणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटल्याचे मुंबई पोलिसांच्या अहवालात स्पष्ट झाल्यानंतर आयोगाने ही परीक्षा अधिकृतपणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.आता या पदासाठी लवकरच फेरपरीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षा रद्द करून आयोगाने या परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचे एकाप्रकारे मान्य केले असले, तरी या पेपरफुटीमागे एक अजब ‘लव्ह स्टोरी’ कारणीभूत असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. दरम्यान या प्रकरणाशी संबंधित तीन अधिकाऱ्यांना अटक करण्यात आले आहे. तसेच परीक्षार्थींचे नातेवाईक आणि क्लासचालकांना अशा सहा जणांना अटक करण्यात आली आहे.







पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका प्रियकराने आपल्या प्रेयसीला पास करण्यासाठी MPSC मधील निम्न स्तरावरील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून हा पेपर फोडला आहे. तपासातील प्राथमिक निष्कर्षानुसार हा फुटलेला पेपर केवळ एकाच उमेदवारापर्यंत पोहोचला होता. मात्र, परीक्षेची गोपनीयता आणि पारदर्शकता अबाधित ठेवण्यासाठी आयोगाने संपूर्ण परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेतला, ज्याचा फटका इतर प्रामाणिक विद्यार्थ्यांना बसला आहे.
प्रकरणात मोठी कारवाई, 6 आरोपींना अटक
पोलिसांनी या प्रकरणी वेगाने कारवाई करत आतापर्यंत एकूण 6 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. यामध्ये MPSC मधील कर्मचाऱ्यांसह खासगी व्यक्तींचा समावेश आहे. प्रियकराच्या सांगण्यावरून पेपर लीक करण्यात मदत करणारे आयोगाचे तीन कर्मचारी आणि तीन खासगी व्यक्ती अशा एकूण सहा जणांचा समावेळ आहे. यामध्ये पेपर फुटीचा कट रचणारा मुख्य सूत्रधार (प्रियकर), क्लासचालक आणि संबंधित विद्यार्थ्याच्या नातेवाईकाचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना 2 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच आर्थिक गैरव्यवहार झाला आहे का, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
औषध निरीक्षक परीक्षेत गैरव्यवहार, फेरपरीक्षा होणार
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक गट-ब या संवर्गासाठी आयोगाने 29 जुलै 2025 रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानुसार २२ मार्च २०२६ रोजी राज्यातील सहा विभागीय मुख्यालयांच्या ठिकाणी ऑफलाइन पद्धतीने चाळणी परीक्षा घेण्यात आली होती. चाळणी परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी आयोगाला काही उमेदवार तसेच लोकप्रतिनिधींकडून प्राप्त झाल्या. त्यानंतर राज्यात विरोधकांनी परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानुसार मंगळवारी रात्री परीक्षा रद्द करण्याची घोषणा राज्य लोकसेवा आयोगाने केली.













