पुण्यात आणखी एक महाकाय MIDC! चाकण-रांजणगाव नको, ‘या’ भागात उभं राहणार ७४३ हेक्टरचं नवं इंडस्ट्रियल हब

0

पुणे जिल्ह्यातील औद्योगिक विस्ताराला आता आणखी एक नवी दिशा मिळणार आहे. शिरूर आणि खेड तालुक्यांच्या सीमावर्ती भागातील पाबळ-धामारी परिसरात तब्बल ७४३ हेक्टर क्षेत्रावर नवीन औद्योगिक वसाहत उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने एमआयडीसीने जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू केली असून, संबंधित जमिनींच्या सातबारा उताऱ्यावर ‘अधिसूचित क्षेत्र’ असा शेरा टाकण्यास सुरुवात झाली आहे.

पुणे जिल्ह्यात हिंजवडी, चाकण, तळेगाव, रांजणगाव यांसारख्या औद्योगिक पट्ट्यांनंतर आता शिरूर-खेडच्या सीमावर्ती भागात आणखी एक मोठे औद्योगिक क्षेत्र विकसित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या परिसरातील औद्योगिक आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

अधिक वाचा  राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, दिल्ली पोलिसांत पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा दाखल, FIR मध्ये मात्र अजब नोंद

७४३ हेक्टर जमीन संपादनाच्या हालचाली

पाबळ-धामारी परिसरातील ७४३ हेक्टर जमीन संपादनासाठी राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. जून २०२६ मध्ये राज्य शासनाने अधिसूचना काढल्यानंतर प्रशासकीय प्रक्रिया पुढे सरकली. पुणे उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि शिरूर तहसील कार्यालयातील पत्रव्यवहारानंतर आता गावपातळीवर प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झाली आहे. जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर ‘अधिसूचित क्षेत्र’ असा शेरा टाकण्यात येत असल्याने प्रस्तावित औद्योगिक क्षेत्रासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया अधिकृतपणे पुढे गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुण्याच्या औद्योगिक नकाशावर नवा पट्टा

चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्यावर वाढता ताण, वाहतूक कोंडी आणि उपलब्ध जमिनीची मर्यादा पाहता पुणे जिल्ह्यात नवीन औद्योगिक क्षेत्रांची गरज वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पाबळ-धामारी परिसरातील प्रस्तावित एमआयडीसी महत्त्वाची ठरणार आहे. नवीन औद्योगिक क्षेत्र विकसित झाल्यास स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती, रस्ते, वीज, पाणी आणि अन्य पायाभूत सुविधांचा विकास होण्याची शक्यता आहे. तसेच शिरूर आणि खेड तालुक्यांच्या सीमावर्ती ग्रामीण भागाला औद्योगिक विकासाची नवी ओळख मिळू शकते.

अधिक वाचा  मुंबई-ठाण्यात ED चे छापे 1 कोटी जप्त केंद्रीय अधिकारी असल्याचा भास 113 कोटींच्या क्रिप्टो फसवणुकीचा पर्दाफाश

शेतकऱ्यांच्या भूमिकेकडे लक्षदरम्यान, जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू झाल्याने संबंधित जमीनधारक आणि शेतकऱ्यांचे लक्ष आता शासनाकडून मिळणाऱ्या मोबदल्याकडे लागले आहे. जमीन संपादनाची पुढील प्रक्रिया कशा पद्धतीने होते आणि स्थानिकांना किती मोबदला मिळतो, यावर या प्रकल्पाचे भवितव्य मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार आहे. एकूणच, पाबळ-धामारी परिसरातील ७४३ हेक्टर क्षेत्रावर प्रस्तावित औद्योगिक वसाहत प्रत्यक्षात आली, तर पुण्याच्या औद्योगिक नकाशावर आणखी एका मोठ्या एमआयडीसीची भर पडणार आहे.