अवघ्या २४ तासांत धरणांत ७०४ एमसीएफटी पाण्याची भर; पुणेकरांसाठी मोठा दिलासा! वरसगाव धरणातून शहरासाठी होणाऱ्या विसर्गाची भर

0

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून रविवारी (५ जुलै) सकाळी सहा वाजेपर्यंतच्या २४ तासांत चारही धरणांमध्ये मिळून ७०४ एमसीएफटी (०.७०४ टीएमसी) पाण्याची आवक झाली.पुणे शहराचा सध्याचा सरासरी प्रतिदिन ४० एमसीएफटी पाणीवापर विचारात घेतल्यास, अवघ्या २४ तासांत जमा झालेला हा पाणीसाठा शहराची सुमारे १८ दिवसांची तहान भागविण्यासाठी पुरेसा आहे.

धरणसाखळीतील एकूण उपयुक्त पाणीसाठा ५.०९ टीएमसी (१७.४७ टक्के) इतका झाला आहे. पानशेत धरण परिसरात ७२ मिमी, वरसगावमध्ये ६८ मिमी, टेमघरमध्ये सर्वाधिक ११५ मिमी, तर खडकवासला धरण परिसरात २४ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक कायम आहे.

अधिक वाचा  समाविष्ट २३ गावांतील ६२६ कर्मचाऱ्यांचे भवितव्य अधांतरी! नगरविकास विभागाकडून महापालिकेला पत्र प्राप्त प्रकरण काय?

रविवारी सकाळी सहा वाजता २४ तासात पानशेत धरणात ०.२३८ टीएमसी (२३८ एमसीएफटी), वरसगावमध्ये ०.३२३ टीएमसी (३२३ एमसीएफटी), टेमघरमध्ये ०.१०७ टीएमसी (१०७ एमसीएफटी) आणि खडकवासला धरणात ०.०३६ टीएमसी (३६ एमसीएफटी) पाण्याची आवक सुरू होती.

धरणनिहाय उपयुक्त पाणीसाठा

पानशेतमध्ये २.४५ टीएमसी (२२.९९ टक्के),

वरसगावमध्ये २.२६ टीएमसी (१७.६६ टक्के),

खडकवासला धरणात ०.३० टीएमसी (१४.९७ टक्के)

आणि टेमघरमध्ये ०.०९ टीएमसी (२.३१ टक्के)

पाणीसाठा उपलब्ध आहे. शनिवारी संध्याकाळी हा साठा ४.६८ टीएमसी होता. त्यामुळे अवघ्या १३ तासांत सुमारे ०.४१ टीएमसी पाणीसाठ्यात भर पडली आहे.

अधिक वाचा  “जरा बारामतीकडेही लक्ष द्या!”, दादा जाताच समस्यांनी डोकं वर काढलं? पवार कुटुंबाला लिहिलेल्या खुल्या पत्राने खळबळ

दरम्यान, पुणे शहरासाठी खडकवासला धरणातून ४१२ क्युसेक्स पाणी बंद जल वाहिनीतुन सोडले जात असून, त्याचवेळी वरसगाव धरणातून ४०० क्युसेक्स पाणी खडकवासला धरणात येत आहे. त्यामुळे शहरासाठी होणाऱ्या विसर्गाची भर मोठ्या प्रमाणात वरसगाव धरणातून भरून निघत आहे.

मात्र, गेल्या वर्षी याच दिवशी धरणसाखळीत १७.६७ टीएमसी (६०.६२ टक्के) पाणीसाठा होता. त्याच्या तुलनेत यंदाचा साठा अद्याप लक्षणीय कमी असला, तरी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत असल्याने दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे.

5 दिवसांत १.४६ टीएमसीची भर

३० जून रोजी खडकवासला धरणसाखळीत ३.६३ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा होता. त्यानंतर पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने अवघ्या पाच दिवसांत साठा वाढून ५.०९ टीएमसी झाला. म्हणजेच या कालावधीत धरणसाखळीत १.४६ टीएमसी पाण्याची भर पडली आहे. पुणे शहराचा सरासरी ४० एमसीएफटी प्रतिदिन पाणीवापर विचारात घेतल्यास, हा वाढलेला पाणीसाठा सुमारे ३६ ते ३७ दिवस, म्हणजेच महिनाभराहून अधिक कालावधीचा पाणीपुरवठा करण्याइतका आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे आगामी काही दिवसांतही धरणसाखळीतील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  शाळेच्या पाहणीसाठी जाताच अभिजीत दिपके यांच्या सहकाऱ्यांना मारहाण; गावकऱ्यांचा हल्ला काचाही फोडल्या