‘ऑपरेशन टायगर’ला पडद्यामागून फडणवीसांचेही बळ?केंद्रीय नेतृत्वाकडून वारंवार विचारणा मग मोलाची मदत!

0

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवून देणारे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी होण्यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची भूमिका होती, अशी माहिती मिळत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ‘ऑपरेशन टायगर’ मोहीम फत्ते करण्याकरिता आवश्यक असलेले खासदारांचे संख्याबळ पूर्ण करण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई मोलाची ठरल्याचे म्हटले जात आहे. ‘ऑपरेशन टायगर’शी संबंध नसल्याची भूमिका भाजपाने घेतली होती, परंतु, आता पडद्यामागून मुख्यमंत्री फडणवीस सूत्र हलवत होते, अशी माहिती समोर येत असून, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासूनच खासदारांच्या प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती. जानेवारी २०२६ मध्ये भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून यावर गंभीरपणे विचार सुरू झाला होता. या आधी ‘ऑपरेशन टायगर’ राबवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किमान पाच वेळा तरी भाजप श्रेष्ठींची भेट घेतली होती, असे समजते. राज्यात उद्धवसेनेचे खासदार शिंदेसेनेत आणण्याच्या प्रक्रियेत पूर्णपणे मौन बाळगून असलेल्या मुख्यमंत्री फडणवीसांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सूचक विधान करत धक्का दिला. ऑपरेशन यशस्वी झाले आहे आणि रुग्ण एकदम सुदृढ आहे. कोणीही काळजी करण्याची गरज नाही, असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रथमच या सर्व घडामोडींवर उघडपणे व्यक्त झाले होते.

अधिक वाचा  ऑपरेशन टायगर फेल होणार? ओम राजेनिंबाळकरांच्या या विधानाने 5 खासदारांची धाकधूक वाढली; दोन दिवसांत…

खासदारांची हाती कमळ धरण्याची इच्छा होती

खासदारांना भाजपामध्ये प्रवेश द्यायचा की शिवसेनेत यावर निर्णय होत नव्हता. बहुतांश खासदारांची हाती कमळ धरण्याची इच्छा होती, मात्र खासदारांना शिवसेनेतच प्रवेश दिला गेला पाहिजे, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात आहे. याकरिता केंद्रीय नेतृत्वाबरोबर फडणवीस यांच्या बैठकाही झाल्या. ऑपरेशन टायगरचे तर ठरले होते. परंतु त्यांना भाजपमध्ये घ्यायचे की शिवसेनेत हेच ठरत नसल्याने मुख्यमंत्र्यांनी या सगळ्याबाबत मौन बाळगले होते.

सहाव्या खासदाराचे तळ्यात-मळ्यात अन् फडणवीसांचा पुढाकार

शिवसेनेत प्रवेश द्यायचा की भाजपामध्ये यावर मोठे मंथन झाल्यानंतर एप्रिलमध्ये ‘ऑपरेशन टायगर’ला भाजपाच्या केंद्रीय हिरवा कंदील दाखवला. पाच खासदारांना आपल्याकडे वळविण्यात एकनाथ शिंदे यांना यश आले. परंतु खासदारांचे संख्याबळ पाचच्या पुढे जाण्यास तयार नव्हते. भाजपा केंद्रीय नेतृत्वाकडून मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे विचारणा होऊ लागली. अखेर ही जबाबदारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे दिली. मुख्यमंत्री फडणवीसांनी सहाव्या खासदाराशी संपर्क साधून त्याचे मन वळविले. त्याच्या राजकीय कारकिर्दीची जबाबदारी घेण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आणि हा तिढा सुटला. दरम्यान, जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सूत्रे वेगाने हलली आणि ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाले. सहा खासदारांनी दिल्ली गाठत लोकसभा अध्यक्षांना पत्र देत ठाकरे गटाला शेवटचा दणका दिला.

अधिक वाचा  खासदार बजरंग सोनवणेंना मोठा धक्का पोलिसांची ही कारवाई विलास घुले हत्याप्रकरणात मुलाचा पाय खोलात