तीन संघ प्लेऑफमध्ये, तीन संघ स्पर्धेबाहेर! अखेरच्या स्थानासाठी ४ संघांमध्ये चुरशीची लढत; ‘हा’ संघ मजबूत स्थितीत

0

आयपीएल २०२६ चा हंगाम आता अखेरच्या टप्प्यात पोहोचला आहे. पुढच्या आठवड्यापासून सुरू होणाऱ्या प्लेऑफसाठी ४ संघांमध्ये रस्सीखेच अजून कायम आहे. ३ संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत, तर ३ संघ स्पर्धेतून बाहेर झाले आहेत. आता उर्वरित ४ संघांमध्ये अखेरच्या जागेसाठी लढत असणार आहे. यामुळे स्पर्धेतील पुढील सर्व सामने महत्त्वाचे असतील. दरम्यान गुणतालिकेचं चित्र कसं आहे आणि ४ संघांसाठी प्लेऑफचं समीकरण कसं असणार, हे जाणून घेऊया….

गुजरात टायटन्सविरूद्धच्या ८९ धावांच्या मोठ्या पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्सचा संघ स्पर्धेबाहेर झाला आहे. तर यापूर्वी लखनौ सुपर जायंट्स व मुंबई इंडियन्सचे संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाले आहेत. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स व सनरायझर्स हैदराबाद हे संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. आता पंजाब, कोलकाता, राजस्थान व दिल्ली यांच्यात चौथ्या स्थानासाठी चढाओढ असेल.

अधिक वाचा  सुतारदरा वीज समस्या सुटणार; नगरसेविका मनिषा बुटालांच्या प्रयत्नामुळे ३१५ केव्हीएचा नवीन ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित होणार ना. चंद्रकांतदादांचे हे निर्देश

राजस्थान रॉयल्ससाठी मुंबईविरूद्ध विजय हेच प्लेऑफचं एकमेव समीकरण

आयपीएल २०२६ हंगामातील ६६ लीग सामन्यांनंतर गुणतालिका पाहिल्यास, राजस्थान रॉयल्स चौथ्या क्रमांकावर आहे, ज्यांनी आतापर्यंत १३ सामने खेळले असून त्यात ७ सामने जिंकले आहेत, तर ६ सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे आणि त्यांचे एकूण १४ गुण आहेत. राजस्थान रॉयल्सचे प्लेऑफमधील स्थान आता त्यांच्या हातात आहे. जर त्यांनी २४ मे रोजी मुंबई इंडियन्सविरुद्धचा साखळी फेरीतील शेवटचा सामना जिंकला, तर ते १६ गुणांसह सहजपणे प्लेऑफमधील आपलं स्थान निश्चित करतील. मात्र, जर त्यांनी सामना गमावला तर त्यांच्यासाठी परिस्थिती बदलेल, कारण त्यांना साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यामध्ये पंजाब किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्स या दोन्ही संघांच्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागेल.

अधिक वाचा  इंधनाचे दर पुन्हा वाढले! बुधवारी मध्यरात्रीपासून नवीन दरवाढ लागू; पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी

पंजाब किंग्ससाठी प्लेऑफचं समीकरण कसं आहे?

गुणतालिकेत दीर्घकाळ अव्वल स्थानी असलेला पंजाब किंग्स संघ, सलग सहा सामने गमावल्यामुळे आता १३ सामन्यांतून १३ गुणांसह पाचव्या स्थानावर घसरला आहे. पण प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहेत. पंजाब किंग्सला २३ मे रोजी लखनौ सुपरजायंट्सविरुद्धचा सामना जिंकणं आणि आपला नेट रन रेट सुधारणं महत्त्वाचं असणार आहे. याव्यतिरिक्त, राजस्थान रॉयल्स आणि केकेआरने त्यांचे साखळी फेरीतील शेवटचे सामने हरावेत यासाठी त्यांना प्रार्थना करावी लागेल. जर केकेआरने सामना जिंकला तरी, दोन्ही संघ प्रत्येकी १५ गुणांवर बरोबरीत असतील आणि नेट रन रेट हा निर्णायक घटक ठरेल. जर राजस्थान रॉयल्सने साखळी फेरीतील आपला शेवटचा सामना जिंकला, तर ते १६ गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश करतील.

अधिक वाचा  स्थायी समिती विधान परिषद आचारसंहितेतून विशेष परवानगीनंतर आक्रमक; या महत्त्वाच्या प्रश्नांसाठी अधिकाऱ्यांची घेतली शाळा

केकेआर आणि दिल्लीसाठी कसं आहे समीकरण?

कोलकाता नाईट रायडर्स १३ सामन्यांनंतर एकूण १३ गुणांसह सहाव्या स्थानी आहेत. केकेआरसाठी राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स यांच्या पराभवाची आशा करावी लागेल, तर त्यांना २४ मे रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सामना जिंकावा लागेल.

दिल्ली कॅपिटल्सकडे सध्या १३ सामन्यांमधून केवळ १२ गुण असून त्यांचा नेट रन रेट -०.८७१ आहे. त्यामुळे, त्यांना केकेआरविरुद्धचा आपला शेवटचा साखळी सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल, तसेच पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या दोघांचाही त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यांमध्ये पराभव व्हावा अशी प्रार्थना करावी लागेल. जेणेकरून चांगल्या नेट रन रेटमुळे त्यांना १४ गुणांसह प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यास मदत होऊ शकते.