मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळाची दोन वर्षे मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल, कोणाला संधी? राज्यसभा ३४ जागांची रणनीती? या राज्यांमधील वरिष्ठ नेत्यांची, माजी मुख्यमंत्र्यांची नावे चर्चेत

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होणार आहे. तसेच भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक पुनर्बांधणी केली जाणार आहे. सरकारमधील महत्वाच्या पदांवर भाजपा तसेच एनडीएच्या घटक पक्षांतील नेत्यांची नियुक्ती होणार आहे.या संदर्भात भाजपाच्या दिल्लीतील मुख्यालयात बुधवारी एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासह इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते. उत्तर प्रदेश, आसाम आणि तेलंगणा या राज्यांतील काही नेत्यांना या बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या नेतृत्वात भाजपाची संघटनात्मक पुनर्बांधणी करण्याची आवश्यकता आहे, असे बैठकीत उपस्थित नेत्यांनी अधोरेखित केले. बैठकीत सहभागी नेत्यांनी आपापल्या राज्यातील कार्यकारिणीबाबतचे अहवाल सुपूर्द केल्याची माहिती आहे.

मंत्रिमंडळात फेरबदल, भाजपात संघटनात्मक बदल

भाजपाकडून काही नेत्यांना राज्यसभेत पाठवून त्यांना पदोन्नती देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. भाजपामधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिक मास संपल्यानंतर १५ जूननंतर मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहे. केंद्रातील भाजपा प्रणित एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाची दोन वर्षे पूर्ण होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २० मे रोजी पाच देशांचा दौरा करून दिल्लीतील निवासस्थानी परतले आहेत. याच आठवड्यात ते मंत्रिमंडळाच्या परिषदेची बैठक घेणार आहेत. भाजपा व केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलासाठी हालचालींना वेग आला आहे. जून, जुलै आणि नोव्हेंबर या तीन महिन्यांत राज्यसभेच्या एकूण ३४ जागा रिक्त होणार आहेत. त्यामुळे भाजपामध्ये अंतर्गत फेरबदल होणार आहेत. दिल्ली, हरयाणा, त्रिपुरा, पंजाब आणि कर्नाटकसह जवळपास १२ हून अधिक राज्यांमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांना एक नवीन टीम दिली जाणार आहे. विविध आयोग, मंडळ आणि राज्यपाल या पदांवर नवीन चेहऱ्यांची नेमणूक करण्याची तयारी भाजपा नेतृत्व करत आहे.

अधिक वाचा  गेल्या ११ दिवसांतील ही चौथी वाढ… CNG दरवाढीचा नवा धक्का! मुंबई-पुण्यात दर किती? शहरानुसार सीएनजीचे नवे दर

पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात किती मंत्री?

एका वरिष्ठ भाजपा नेत्याने म्हटले की, पक्ष तसेच जनतेच्या भावना लक्षात घेऊन राज्यसभा उमेदवारांची निवड केली जाईल. राज्यसभेत निवडून येणाऱ्या काही खासदारांना केंद्रीय मंत्रिमंडळातही स्थान मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात सध्या ३० मंत्री, ३६ राज्यमंत्री आणि ५ स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आहेत. “एनडीए मधील प्रसिद्ध असलेल्या नेत्यांबाबत पक्षात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. त्या नेत्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल. तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमधील काही वरिष्ठ नेत्यांची, माजी मुख्यमंत्र्यांची नावे चर्चेत आहेत. तसेच काही राज्यपालांच्या नावांचा देखील विचार सुरू आहे. “, अशी माहिती भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिली.

मित्रपक्षांमध्ये समतोल साधण्याचे आव्हान

राज्यसभेच्या जागा रिक्त होणार असल्याने भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणी सध्या उमेदवारांचा शोध घेत आहे. “उमेदवारांची नावे राज्य निवड समितीकडून केंद्रीय निवड समितीकडे पाठवली जातील. त्यानंतर त्यावर सविस्तर विचार केला जाईल. जात तसेच स्त्री-पुरूष समानतेच्या दृष्टीकोनातून नावांवर विचार होईल”, असे सूत्राने सांगितले. आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात राज्यसभेचे उमेदवार निश्चित करताना भाजपाला मित्रपक्षांबरोबर समतोल साधावा लागणार आहे. तसेच केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल करतानाही मित्रपक्षांचा विचार करावा लागेल. “आंध्र प्रदेशात जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवताना भाजपाला मित्रपक्ष असलेल्या चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगु देसम पक्ष आणि पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षात समतोल साधावा लागेल. हेच समीकरण कर्नाटकातील मित्रपक्ष जनता दल (सेक्युलर) बाबतही वापरावे लागेल”, असे एका नेत्याने म्हटले आहे.

अधिक वाचा  कांदा खरेदी दरात वाढ शेतकऱ्यांना दिलासा! आजपासून असणार ‘हा’ नवा दर; भावासाठी हतबल न होता थेट ग्राहकांसाठी नामीशक्कल

राज्यसभेच्या ३४ जागा रिक्त होणार

राज्यसभेत भाजपाचे सध्या ११३ खासदार आहेत, तर भाजपा व एनडीएतील मित्रपक्षाचे एकूण १४८ खासदार आहेत. दोन तृतियांशचा आकडा गाठण्यासाठी भाजपाला १५ खासदार कमी पडतात. राज्यसभेची एकूण सदस्यसंख्या २४५ आहे. दोन तृतियांश खासदारांचे समर्थन असल्यास भाजपाचा घटनात्मक दुरूस्ती विधेयक मंजूर करून घेण्याचा मार्ग मोकळा होतो.

जून ते नोव्हेंबर दरम्यान राज्यसभेच्या ३४ जागा रिक्त होणार आहेत. याआधी बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली. रिक्त होणाऱ्या ३४ जागांमध्ये उत्तर प्रदेशच्या ११; आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरातच्या प्रत्येकी ४ जागा; मध्य प्रदेश, राजस्थानच्या प्रत्येकी ३ जागा; उत्तराखंड, झारखंड, मेघालय, मिझोराम आणि अरूणाचल प्रदेशची प्रत्येकी १ जागा यांचा समावेश आहे.

पेट्रोलियम मंत्र्यांसह माजी पंतप्रधान राज्यसभेतून होणार निवृत्त

जूनमध्ये रिक्त होणाऱ्या २२ जागांपैकी १२ जागा भाजपाच्या आहेत. जुलैमध्ये रिक्त होणारी १ जागा मिझोराम मधील एनडीएचा घटक असलेल्या मिझो नॅशनल फ्रंटची आहे. तर नोव्हेंबर महिन्यात रिक्त होणाऱ्या ११ जागांपैकी १० जागा भाजपाच्या आहेत. जून महिन्यात राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांमध्ये रेल्वे राज्यमंत्री आणि अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू, जनता दल सेक्युलरचे प्रमुख आणि माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचा समावेश आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी, उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा, भाजपाचे सरचिटणीस अरूण सिंह, समाजवादी पक्षाचे नेते राम गोपाल यादव हे नेते नोव्हेंबर महिन्यात राज्यसभेतून निवृत्त होणार आहेत.

अधिक वाचा  हा राजकीय पक्षही फुटला ‘मॅजिक’ 111 चा आकडा जवळ? आत्ता एकत्र 4 जागी पोट निवडणूक; ‘या’ 3 आमदारांचा तडकाफडकी राजीनामा

मोदींच्या मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केंद्रीय मंत्रिपरिषदेची बैठक घेणार आहेत. या वर्षातील ही पहिलीच मंत्रिपरिषद बैठक असून काही मंत्रालयांच्या कामकाजांचाही आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे. ही बैठक केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य फेरबदलाच्या दृष्टीनेही महत्त्वाची मानली जात आहे. पश्चिम आशियातील संघर्षाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत असून विविध मुद्द्यांची चर्चा केली जाणार असल्याचे सांगितले जाते. भाजपमधील संघटनात्मक तसेच, केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदलाचीही चर्चा सुरू झाली आहे. मंत्रिपरिषदेच्या बैठकीमध्ये काही मंत्र्यांच्या कामांचा आढावा घेतला जाणार असल्याने संबंधित बदलांबाबत तर्कवितर्क केले जात आहेत. पुढील वर्षी उत्तर प्रदेश व गुजरात, पंजाब या राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होत असून केंद्रीय मंत्रिमंडळातही त्यादृष्टीने बदल केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालय दोन वर्षे सातत्याने वादात सापडले असून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या कार्यक्षमेतवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी हेही वादाच्या भोवर्‍यात अडकले होते. १५ जूननंतर मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.