कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढल्यानं तसंच कांदा साठवणुकीत होत असलेल्या अडचणीमुळं गेल्याकाही दिवसांपासून कांद्याच्या खरेदी दरात मोठी घट झाली आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळं या नगदी पिकासाठी मोठी मेहनत घेऊनही पदरी काहीच पडत नसल्यानं केंद्र सरकारनं वाढीव दरानं कांदा खरेदी करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत होती.






शेतकऱ्यांची ही सातत्यानं होणारी मागणी आणि त्यांच्या नुकसानीबाबतच्या येणाऱ्या बातम्या यानंतर केंद्र सरकारनं आता उद्यापासून अर्थात २६ मे पासून कांदा खरेदीच्या दरात वाढ केली आहे. उद्यापासून नाफेड आणि NCCF कडून नव्या दरानं कांद्याची खरेदी केली जाणार आहे. त्यामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे.
नवा दर ‘हा’ असणार
आजपर्यंत १,२३५ रुपये प्रति क्विंटल या भावानं सरकारकडून शेतकऱ्यांचा कांदा खरेदी केला जात होता. आता उद्यापासून १,५८० रूपये प्रति क्विंटल दराने कांदा खरेदी केली जाणार आहे. केंद्र शासनानं घेतलेल्या या निर्णयामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यामुळं थोडे अधिकचे पैसे त्यांच्या हातात पडणार आहेत.
सध्या किरकोळ बाजारात कांदा थेट ग्राहकाला साधारण २० रुपये किलो दरानं विकला जात आहे. पण हाच कांदा बाजार समित्यांमध्ये १ ते २ रुपये किलो या दरानं लिलावात विकला जात आहे. कांद्याचे भाव पडल्यामुळं काही शेतकऱ्यांनी हतबल न होता थेट रस्त्याच्या कडेला आपल्या मालाच्या गाड्या थांबवून थेट ग्राहकांना बाजारभावापेक्षा काहीशा कमी दरानं विक्री सुरु केली आहे.













