राज्यात २३ जिल्ह्यांत तापमानाने गाठला ४५ अंशाचा पारा; वादळी वाऱ्याने दहा जणांचा मृत्यू

0

राज्यातील २३ जिल्ह्यांत तापमानाने ४५ अंशांचा पारा गाठल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात उष्म्याने हाहाकार माजवला असतानाच वळीव पाऊस आणि वादळी वाऱ्यानेही अनेक ठिकाणी झोडपून काढले आहे.वर्धा, चंद्रपूर, नंदूरबार, अमरावती, यवतमाळ, नागपूर, अहिल्यानगर, बुलढाणा, धुळे, जळगाव, ठाणे, रायगड, नाशिक, पालघर, पुणे, अकोला, छत्रपती संभाजीनगर,जालना, नांदेड, परभणी, सोलापूर, वाशिम, बीड या जिल्ह्यांमध्ये तापमान ४५ अंशांवर असल्याने या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसला. तर मागील आठवडाभरात ठिकठिकाणी झालेल्या पाऊस व वादळी वाऱ्यामुळे तसेच वीज पडून दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मदत पुनर्वसन विभागाकडून देण्यात आली.

अधिक वाचा  समुद्राच्या लाटा रक्ताळल्या! ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला; भारतीय नौदल हाय अलर्टवर भारताचा इराणला इशारा

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभागाच्यावतीने राज्यातील पिक पाणी आणि हवामानाचे सादरीकरण करण्यात आले. राज्यातील ठाणे जिल्ह्यासह कल्याण-डोंबिवली, नाशिक, नंदूरबार, विदर्भात सोसाट्याच्या वा-यासह पावसाने मोठे नुकसान केले. मराठवाड्यातही काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. ठिकठिकाणी घरांचे पत्रे उडाले. यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड तालुक्यातील दराटी येथे वीज पडून शेतक-याचा मृत्यू झाला तर २ जण जखमी झाले. त्यांना नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे उपचारासाठी दाखल केले.

दुसरीकडे नाशिक, यवतमाळ, कोल्हापूर व रायगडमध्ये चार जणांचा वीज कोसळून मृत्यू झाला तर सांगलीत वादळी वाऱ्यामुळे पत्रे कोसळून सहाजणांचा मृत्यू झाला तर तेरा जण जखमी झाले. रत्नागिरीही वादळी वाऱ्यामुळे पत्रे उडून एकजण जखमी झाला आहे. ५ ते १३ मे याकाळात ही मनुष्यहानी झाली. भर उन्हाळ्यात मुंबई शहर आणि उपनगरात झाडे कोसळून चार जण जखमी झाले. यामध्ये मुंबई शहरात दोन त उपनगरातील दोघांचा समावेश आहे.

अधिक वाचा  यंदा पाऊस किती? पीकपाणी कसं असेल? अल निनोचा प्रभाव कसा असेल? हवामान खात्याचा अंदाज काय?

महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना १५ मे साठी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, जालना, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती, वर्धा या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. याउलट सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.