आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ८ जुलै रोजी आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. सोहळा २४ जुलैला पंढरीत पोहोचणार असून, परंपरेप्रमाणे तीन उभी रिंगणे, चार गोल रिंगणे होतील. पुणे आणि सासवडमध्ये सोहळा प्रत्येकी दोन मुक्कामी राहणार असून, अन्य ठिकाणी प्रत्येकी एक मुक्काम असणार आहे. ३३ दिवसांचा प्रवास करून सोहळा ८ ऑगस्ट रोजी आळंदीत परतणार आहे.






आळंदी देवस्थानचे विश्वस्त आणि दिंडी समाज संघटना यांची बुधवारी (ता. १३) सोहळ्याचे मालक राजेंद्र आरफळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात वेळापत्रक जाहीर करण्यात आले. सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप, प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, चैतन्य महाराज कबीर, ॲड. रोहिणी पवार, आमदार हेमंत रासने, भाऊसाहेब गोसावी महाराज आणि दिंडीकरी, फडकरी उपस्थित होते.
डॉ. देखणे आणि ॲड. उमाप यांनी सांगितले की, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आठ जुलैला रोजी देऊळवाड्यातून प्रस्थान होईल. त्या दिवशीचा मुक्काम आळंदीत नवीन दर्शन मंडपात होईल. नऊ आणि दहा जुलै रोजी पालखी पुण्यात दोन दिवस मुक्कामी असणार आहे. सासवडमध्ये ११ आणि १२ जुलै रोजी मुक्कामी राहील. जेजुरी (ता. १३ जुलै), वाल्हे (ता. १४) मुक्कामी राहील. १५ जुलै रोजी माउलींच्या पादुकांना नीरा स्नान घालण्यात येईल.
लोणंद (ता. १५ जुलै) असणार आहे. १६ जुलै रोजी दुपारी चांदोबाचा लिंब येथे सोहळ्यातील पहिले उभे रिंगण करून सोहळा तरडगाव मुक्कामी जाईल. फलटण (ता. १७), बरड (ता. १८), नातेपुते (ता. १९) मुक्काम करेल. २० जुलै रोजी पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण करून सोहळा माळशिरस (ता. २०) मुक्कामी जाईल.
२१ जुलै रोजी खुडुस फाटा येथे सकाळी दुसरे गोल रिंगण करून सायंकाळी धावाबावी माउंट येथे मानाच्या भारुडानंतर सोहळा वेळापूर मुक्कामी जाईल. २२ जुलै रोजी ठाकूरबुवाची समाधी येथे सोहळ्यातील तिसरे गोल रिंगण आणि दसूरफाटा येथे संत सोपानदेव-माउलींची बंधूभेटीनंतर सोहळा भंडीशेगाव मुक्कामी जाईल. २३ जुलै रोजी दुसरे उभे रिंगण आणि चौथे गोल रिंगण झाल्यानंतर सोहळा वाखरी मुक्कामी जाईल. २४ जुलै रोजी तिसरे उभे रिंगण आणि पादुकाजवळ आरती झाल्यानंतर सोहळा पंढरपूरमध्ये प्रवेश करेल.
सोहळ्यातील रिंगणे….
– पहिले उभे रिंगण – चांदोबाचा लिंब (ता. १६ जुलै)
– पहिले गोल रिंगण – पुरंदवडे (ता. २० जुलै)
– दुसरे गोल रिंगण – खुडूस फाटा (ता. २१ जुलै)
– तिसरे गोल रिंगण – ठाकुरबुवाची समाधी (ता. २२ जुलै)
– दुसरे उभे रिंगण – बाजीरावची विहीर वाखरी (ता. २३ जुलै)
– चौथे गोल रिंगण – बाजीरावची विहीर वाखरी (ता. २३ जुलै)
– तिसरे उभे रिंगण – इसबावी, पंढरपूरजवळ (ता. २४ जुलै)
माउलींच्या पालखीचा मुक्काम भवानी पेठेतच
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील भाविक केंद्रबिंदू मानून पालखी विठोबा मंदिरातील सुविधांबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी लेखी हमीपत्र दिले. त्यानंतर बुधवारी (ता.१३) आळंदी देवस्थानचे विश्वस्त, मानकरी आणि पालखी सोहळा दिंडी समाज संघटना, फडकरी मानकरी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर पुण्यातील भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरातील मुक्कामावर शिक्कामोर्तब झाले आहे.













