महाविकास आघाडीत महाबिघाडी? चर्चेशिवाय निर्णय! काँग्रेसचा या जागेवर दावा; ठाकरेंचा मुख्य प्रवक्ताच धोक्यात

0

विधान परिषदेच्या निवडणुकीवरुन महाविकास आघाडीत महाबिघाडी झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर करताच काँग्रेसनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.कोणतीही चर्चा न करता उमेदवारी जाहीर करणं चुकीचं असल्याचं म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नाराजी बोलून दाखवली आहे. माणिकराव ठाकरे यांनीदेखील याच शब्दांमध्ये नाराजीचा सूर लावला आहे. काँग्रेस पक्षानं विधान परिषदेसाठी उमेदवार देण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे मविआत फूट पडल्याचं चित्र दिसू लागलं आहे.

विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. शिवसेना उबाठानं अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा केली आहे. दानवे विधान परिषदेचे माजी आमदार आहेत. महाविकास आघाडीकडे असलेलं संख्याबळ पाहता त्यांच्या वाट्याला केवळ १ जागा येऊ शकते. मात्र काँग्रेस आणि शिवसेना उबाठात बिनसल्यानं मविआच्या हातून एकमेव जागा जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अधिक वाचा  नितेश राणे यांना एक महिना कारावासाची शिक्षा; मुख्य कलमांतून राणे यांची मुक्तता मात्र शांतता भंगाच्या प्रकरणात शिक्षा या प्रकरणात न्यायालयाचा निकाल

विधान परिषदेची निवडणूक शिवसेना उबाठा पक्ष लढवत असेल तर आम्ही उद्धव ठाकरे यांच्या नावासाठी आग्रही होतो. त्यांच्या नावाला आमचा पूर्ण पाठिंबा होता. पण त्यांनी आमच्याशी कोणतीही चर्चा न करता उमेदवार जाहीर केला. महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर करताना आघाडीतील पक्षांशी किमान चर्चा करायला हवी होती, अशा शब्दांत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नाराजी बोलून दाखवली. ठाकरेंच्या निर्णयाबद्दल उघड नाराजी व्यक्त करणारे वडेट्टीवार कधीकाळी ठाकरेंच्याच पक्षात होते. २००४ मध्ये ते शिवसेनेच्या तिकिटावर चिमूर मतदारसंघातून निवडून आले होते. पुढे त्यांनी काँग्रेसची वाट धरली.

अधिक वाचा  पुण्यातील या नामांकित विधी महाविद्यालयावर मोठी कारवाई! विद्यार्थ्यांना व्याजासह पैसे परत करण्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांचे आदेश

‘शिवसेनेकडून अंबादास दानवेंच्या नावाची घोषणा झाल्यावर मी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी बोललो. शिवसेनेनं दानवेंच्या नावासंदर्भात तुमच्याशी चर्चा केली होती का, अशी विचारणा सपकाळ यांच्याकडे केली. त्यांनी नकारार्थी उत्तर दिलं. आम्ही आता चर्चा करु. त्यानंतर उमेदवारीबद्दल निर्णय घेऊ,’ असं म्हणत वडेट्टीवार यांनी काँग्रेस विधान परिषदेची निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले.

याचवेळी बोलताना वडेट्टीवार यांनी २ वर्षांनी होणाऱ्या राज्यसभा, विधान परिषदेच्या निवडणुकींचाही उल्लेख केला आहे. ‘नुकतीच राज्यसभेची निवडणूक झाली. त्यावेळी शरद पवारांच्या नावावर आमचं एकमत झालं. आता परिषदेसाठी उद्धव ठाकरेंना आमचा पाठिंबा होताय पण आमच्याशी चर्चा न करता त्यांनी उमेदवार जाहीर केला. त्यामुळे २ वर्षांनी होणाऱ्या राज्यसभेची जागा आम्हालाच मिळायला हवी,’ अशी ठाम भूमिका वडेट्टीवार यांनी घेतली.

अधिक वाचा  बारामतीमध्ये काल एवढंच मतदान सुनेत्रा पवार तो महारेकॉर्ड साधतील का?; 4 मे रोजी फैसला

२०२८ मध्ये रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या जागेवर काँग्रेसनं आताच दावा केला आहे. यामुळे शिवसेना उबाठाचे फायरब्रँड नेते आणि खासदार संजय राऊत यांची गोची झाली आहे. संजय राऊत यांच्या राज्यसभेची टर्म २०२८ मध्ये संपेल. मविआतील अन्य पक्षांनी सहकार्य केल्याशिवाय ते पुन्हा राज्यसभेवर जाऊ शकणार नाहीत. कारण ठाकरेंच्या शिवसेनेकडे त्यांना राज्यसभेवर पाठवण्याइतकं संख्याबळ नाही. अशा परिस्थितीत संजय राऊत माजी खासदार होण्याची शक्यता आहे.