विधान परिषदेसाठी पुण्यात एक जागा ‘फिक्स’ पण जिल्ह्यातील दोन दबंग नेते बिघडवणार शहरातील या चेहऱ्यांचं गणित

0

राज्याच्या राजकारणात सध्या विधानपरिषदेच्या नऊ जागांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असून पुण्यातील महायुतीसह महाविकास आघाडीच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. संख्याबळाच्या गणितात भाजपकडे पाच जागांवर विजयाची खात्री असली, तरी पुण्यातून नेमकं कोणाचं नशीब उघडणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. पुण्यासाठी एक जागा ‘फिक्स’ मानली जात असली, तरी तो उमेदवार शहरातला असावा की ग्रामीण भागात ताकद वाढवण्यासाठी तिथला असावा, यावरून भाजपच्या गोटात मोठा पेच निर्माण झाला आहे. पुणे शहरातून सध्या दोन प्रमुख नावांची सर्वाधिक चर्चा रंगली आहे. यात पहिले नाव म्हणजे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे. संघटनेत दीर्घकाळ काम करणाऱ्या सरचिटणीसांना न्याय देण्याची भाजपची जुनी परंपरा राहिली आहे, त्यामुळे पांडे यांचे पारडे जड मानले जाते.

अधिक वाचा  पोटनिवडणूक मतदानापूर्वी केंद्राच्या ‘एनसीडीसी’चा झटका! अजितदादांच्या ‘छत्रपती’सह 7 साखर कारखान्यांना फटका!  

मात्र, दुसरीकडे माजी आमदार जगदीश मुळीक यांच्या नावाचीही प्रबळ दावेदारी आहे. वडगाव शेरी विधानसभेच्या वेळी झालेली राजकीय तडजोड आणि खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुळीक यांना दिलेले आमदारकीचे जाहीर आश्वासन पक्ष कशा पद्धतीने पाळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दुसरीकडे, ग्रामीण भागात भाजपची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने पक्षश्रेष्ठी वेगळा विचार करण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात पकड मिळवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. विशेष म्हणजे, भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांचेही नाव सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आले आहे.

अधिक वाचा  होर्मुझची सामुद्रधुनी खुली होताच तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर काय परिणाम होणार?

आगामी विधानसभेची गणिते पाहता थोपटे यांच्या नावाचा विचार करून भाजप ग्रामीण भागात मोठे फेरबदल करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे भाजपची ग्रामीण भागातील ताकद वाढवण्याच्या दिवशी कोणातून ग्रामीण भागातील कोणत्यातरी एका नेत्याला ताकद देण्याचा विचार देखील भाजपाच्या वरिष्ठ मंडळीतून करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.

शहरात पक्षाची ताकद आधीच मोठी असल्याने तिथेच पुन्हा उमेदवारी देण्यापेक्षा ग्रामीण भागात जिथे भाजपला संघर्षाची गरज आहे. तिथे हे पद देऊन ताकद वाढवावी, अशी मागणी पक्षांतर्गत जोर धरत आहे. १२ मे रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी २३ एप्रिलपासून अर्ज भरले जाणार आहेत. त्यामुळे आता पक्षश्रेष्ठी शब्दाला पक्के राहून मुळीक यांना संधी देतात, संघटन कौशल्यासाठी पांडे यांना झुकते माप देतात की संग्राम थोपटे किंवा प्रदीप कंद यांच्या नावाचा विचार करून ग्रामीण कार्ड खेळतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

अधिक वाचा  सुमारे १७ लाख सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत?