महाराष्ट्र विधानसभा निवडुणुकीतील निराशाजनक कामगिरीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. त्यांनी महायुती सरकार दंड थोपटतानाच निवडणुकीतील अपयशानंतर नैराश्याच्या गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बूस्टर डोस दिला. याचदरम्यान,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार,आमदार,पदाधिकारी, कार्यकर्त्यांसाठी मोठा आदेश दिला आहे.
सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा मेळावा शनिवारी (ता.15) पार पडला. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांमध्ये हुंकार भरला. याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी शशिकांत शिंदे यांनी यापुढे कोणालाही फोन लावला किंवा कोणाचा आला तर बोलण्याची सुरूवात ‘हॅलो’ऐवजी ‘जय शिवराय’नं करायची, अशी घोषणा केली. हा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आदेश असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
शशिकांत शिंदे म्हणाले, महाराष्ट्रात एकीकडे सुजलाम सुफलाम करण्याबाबतच्या घोषणा केल्या जातात आणि दुसरीकडे मात्र धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुढील काळात पक्षाकडून तालुकास्तरावरही मेळावे घेतले जाणार आहे. जो कार्यकर्ता सक्षम आहे, त्याच्याकडे पक्षाची जबाबदारी देण्यात येईल. तसेच जो पक्षात येण्यास इच्छुक आहे, त्याला देखील जबाबदारी देण्याचा विचार करण्यात येणार असल्याचेही संकेत शिंदे यांनी यावेळी बोलून दाखवले.
सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा मेळावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, शशिकांत शिंदे, रोहित पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. या मेळाव्यात शशिकांत शिंदे यांनी आपली भूमिका मांडली. आपण निवडणुकीत सांगली जिल्ह्याचा बालेकिल्ला शाबूत ठेवला. परंतु,दुर्दैवाने सातारामधील बालेकिल्ला मात्र नेस्तनाबूत झाला असल्याची भावनाही व्यक्त केली.
तसेच गावा-गावांमध्ये ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज शेवटपर्यंत लढले,त्यांनी हार मानली नाही. त्यांच्यासोबत जे शेवटपर्यंत लढले ते इतिहासामध्ये अजरामर झाले. तसेच, तुम्ही देखील पक्षासोबत शेवटपर्यंत लढण्याचं आवाहनही शिंदेंनी कार्यकर्त्यांना केलं.
यावेळी बीडमधील सतीश भोसले उर्फ खोक्या,मंत्री माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेवरील कोर्टाच्या निरीक्षणावरही शशिकांत शिंदे बोलले. ते म्हणाले, बीडसारख्या घटना राजकीय पाठबळ असल्याशिवाय घडत नाहीत, खोके बोके कुणीही पुढे येत नाहीत.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंवर भाष्य करताना ते म्हणाले,मी न्यायालयाच्या विरोधात बोलत नाही. पण कोर्ट म्हणत असेल,खर्च वाढेल म्हणून निवडणुका परत नको आणि अशा पद्धतीने निकाल देत असतील तर राज्यात पुन्हा निवडणुका होतील की नाही,अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.