महाराष्ट्रातील दुसरे आणि भारतातील तिसऱ्या क्रमाकांचे सर्वात मोठे IT पार्क पुण्यात होत आहे. पुण्यातील हिंजवडी येथील IT पार्कमध्ये अनेक कंपन्या आहेत. कंपन्यांची संख्या वाढत असल्याने या हिंजवडी IT पार्कवर मोठा तणाव येत आहे. पुण्यातील आयटी कंपन्या मोठ्या प्रमणात परराज्यांत स्थलांतर करत आहेत. याचे स्थलांतर रोखण्यासाठी आणि पुणे जिल्ह्यात नव्या औद्योगिक संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने पुरंदर तालुक्यात नवीन आयटी पार्क उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. याबाबतची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत केली. आमदार विजय शिवतारे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिले.






पुरंदर तालुक्यात आयटी पार्क उभारण्याचा विषय अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. आमदार विजय शिवतारेंनी पुरंदर IT पार्कचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. या नंतर मंत्री उदय सामंत यांनी याबद्दल माहिती दिली. पुरंदरमध्ये आयटी पार्क विकसित करण्याच्या दिशेने सकारात्मक पावले उचलत असून महसूल विभागाकडून सध्या यासाठी जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच ही जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (MIDC) सोपवण्याच येणार असून या प्रकल्पाचे काम सुरू होणार अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
पुरंदर IT पार्कसाठा जागा निश्चित
24 जुलै 2024मध्ये रोजी पुरंदर आयटी पार्कसाठी पहिली बैठक पार पडली. त्यानंतर 3 ऑक्टोबर 2025 मध्ये झालेल्या बैठकीत जागेबाबत चर्चा झाली. महसूल विभागाच्या जमीनीवर आयटी पार्क उभारण्याचा निर्णय झाला. त्यानंतर 27 फेब्रुवारी रोजी महसूल विभागाला याबद्दल औपचारिक विनंती पत्र पाठवण्यात आलं आहे. हा प्रस्ताव मान्य होताच जमीन हस्तांतरित करून कामाला सुरूवात करण्यात येणार आहे.
नेमकं कुठे असेल नवं आयटी पार्क?
पुरंदर तालुक्यातील दिवे, कोडीत आणि चांबळी परिसरातील 572 हेक्टर जमीन या प्रकल्पासाठी महसूल विभागाकडून हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रत्यक्षात हे IT पार्क 1500 एकर जागेवर उभारले जाणार आहे. प्रस्तावित पुरंदर विमानतळापासून अवघ्या 3 ते 4 किमी अंतरावर हे आयटी पार्क उभारले जाणार आहे. यामुळे उत्कृष्ट लॉजिस्टिक्स आणि कनेक्टिव्हिटी या IT पार्कला मिळणार आहे. विकास प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि संपादन खर्च कमी करण्यासाठी शासकीय जमीनीवर हे IT पार्क उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हिंजवडी IT पार्कमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सध्या वाहतूक कोंडीसह विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. नव्याने विकसीत करण्यात येणाऱ्या या नव्या IT पार्कमध्ये रस्ते तसेच इतर पायाभूत सेवा सुविधांचे योग्य पद्धतीने नियोजन केले जाणार आहे. पुरंदरच्या या नव्या IT पार्कमुळे महाराष्ट्रात जवळपास 100,000 नोकऱ्या निर्माण होणार आहेत.











